पुणे - पावसामुळे हिरव्यागार झालेल्या डोंगरदऱ्या सध्या पर्यटकांना खुणावत असल्यामुळे उत्साही गिर्यारोहकांची भटकंती सुरू झाली आहे. ट्रेकिंग कॅम्पऐवजी नागरिकांनी छोटे गट करून पुण्याजवळील गडकिल्ले, डोंगरांवर चढाईला सुरुवात केली आहे.
गिर्यारोहक, ट्रेकरची सहा महिन्यांपासून दऱ्याखोऱ्यांतील भटकंती बंद झाली होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकारने लॉकडाउनचे नियम शिथिल करून राज्यात अंतर्गत प्रवासासाठी लागणाऱ्या पासचा नियम वगळला; तसेच हॉटेल, रिसोर्टही सुरू करण्यास परवानागी दिली. पर्यटन सुरू झाल्यामुळे उत्साही गिर्यारोहकांनाही त्यांच्या मोहिमांना हिरवा कंदील मिळाला आहे. पावसाळ्यामुळे हिरवाईने बहरलेल्या डोंगरदऱ्या त्यांना खुणावत आहेत. सिंहगड, राजगड, तोरणा, ताम्हिणी, लोणवळ्यासह पुण्यालगतच्या डोंगरांमध्ये हे ट्रेक सुरू झाले आहेत.
दरम्यान, ट्रेकिंगला सुरुवात केली, तरी यापुढील काळात ग्रामस्थ आणि गिर्यारोहकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी गिर्यारोहणाच्या शिस्तीबरोबरच कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने 'लॉकडाउननंतरचे गिर्यारोहण' ही नियमावली तयार केली आहे.
गिर्यारोहण महासंघाने केलेली नियमावली
- अर्ध्या दिवसाचा ट्रेक असला तरी प्रत्येकाने पाण्यापासून, स्वसंरक्षण आणि आवश्यक साहित्य, कपडे बरोबर ठेवावे.
- गिर्यारोहणाची ग्रुपची संख्या मर्यादित असावी.
- गावातील नियम, परंपरा यांचे पालन करावे. गावकऱ्यांबरोबर आपुलकीने वागावे.
- गावातील पाणवठा गावकऱ्यांसाठी वर्षभराचे जीवन असते. त्याची नासाडी करू नये.
- ट्रेक वा सहलीच्या दिवशी अचानक ताप, सर्दी, खोकला वा डोकेदुखी अशी लक्षणे जाणवल्यास ट्रेकला जाऊ नये. वाटेत अशी लक्षणे जाणवल्यास स्वतःहून जागीच थांबावे किंवा परत फिरावे.
- ओले कपडे बदलताना गाडीचा वापर करा, गावकऱ्यांच्या घरात प्रवेश करू नका.