पुणे - राज्यात एकीकडे मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा हनुमान चालीसा लावू यावरून राजकारण केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात उद्या(16 एप्रिल) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तर दुसरीकडे नाना पेठ येथील साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिराच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तारचा कार्यक्रम (Roza Iftar Party in Pune) आयोजित करण्यात आला आहे.
साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिराच्यावतीने गेल्या 35 वर्षांपासून सामाजिक संदेश देत हनुमान जयंती साजरी केली जात आहे. सामाजिक संदेश देत हिंदू बांधवांकडून मुस्लिमांचा सन्मान तसेच मुस्लिम धर्मियांच्या सणांच्या वेळी त्यांचा विशेष सन्मान केला जात आहे, अशी माहिती यावेळो आयोजक रवींद्र अण्णा माळवदकर यांनी दिली आहे.
जातीय राजकारणाशी देणंघेणं नाही - गेल्या काही दिवसांपासून राज्यात जरी जातीय राजकारण तापले असले, तरी आम्ही आमच्या संस्कृतीप्रमाणे आमच्या येथे सामाजिक संदेश देण्याचे काम हनुमान जयंतीच्या निमित्ताने करत असतो. दरवर्षी विविध विषयांवर व्याख्यान तर सर्व धर्मीय समाजासाठी देखील विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, असे देखील यावेळी माळवदकर म्हणाले.