पुणे - दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवारांवरही टीका
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर महाराष्ट्रात जातिवाद उदयाला आल्याचे म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून टीका करण्यात आली होती. शरद पवार यांनी बोलताना 'त्यांनी प्रबोधनकार ठाकरे वाचावेत' असे म्हणत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, मी प्रबोधनकार ठाकरेही वाचले आहेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत, माझ्या वक्तव्याचा आणि प्रबोधनकारांचा काय संबंध आहे, ते पवार साहेबांनी सांगावे. आपल्याला हवे तेवढेच प्रबोधनकार ठाकरे स्वीकारायचे हे चालणार नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातिवाद वाढल्याच्या आपल्या वक्तव्याचा हि त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले हजार वर्षापासून या देशात जाती आहेत. पड 1999 नंतर जातीपातीची द्वेष अधिक वाढला. मागच्या पंधरा ते वीस वर्षाच्या काळातच शाळा आणि महाविद्यालयात जातीपातीनी प्रवेश केलाय. मी जे मत व्यक्त केले अगदी तसंच मत सर्वांचे आहे. फक्त मी ते बोलून दाखवलं. असंही राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
'बाबासाहेब पुरंदरेकडे मी इतिहास संशोधक म्हणून जात असतो'
बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हजेरी लावल्यामुळेही राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत होती. यावर बोलताना ते म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे हे ब्राह्मण आहेत म्हणून मी त्यांच्याकडे जात नाही. तर ते इतिहास संशोधक आहेत, म्हणून मी त्यांच्याकडे जात असतो, असेही ते म्हणाले.
'मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नसेल तर तसे स्पष्ट सांगा'
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले, आरक्षणाची मागणी करत मराठा समाजातील मुला-मुलींनी मोर्चे काढले. पण अजूनही त्यांना आरक्षण मिळाले नाही. मराठा समाजाला जर आरक्षण मिळणारच नसेल तर तसे स्पष्टपणे सांगायला हवे. विनाकारण माथी भडकवण्याचे काम करू नये, या शब्दात राज ठाकरे यांनी आपली भावना मांडली.
हेही वाचा - ...तर कोरोनाच्या तिसर्या लाटेलाही भाजपा कारणीभूत ठरणार - नवाब मलिक