पुणे - राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. दररोज बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वाढत्या घटनांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापैकी 85% घटनांमध्ये जवळच्या नातेवाईकांपैकी कुणाचातरी सहभाग असल्याचे दिसून आले आहे. तर काही घटनांमध्ये जवळच्या मित्राकडून अत्याचार होत आहे. त्यामुळे अशा घटना थांबल्या पाहिजेत. शक्ती कायदा करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे पण फक्त कायदा आणून काय होणार नाही. तर महिलांवर अशा प्रकारच्या घटना कमी करण्यासाठी इतकी कडक शिक्षा व्हायला पाहिजे की, ते बघितल्यानंतर पुन्हा कोणत्याही व्यक्तीच्या मनात असा गुन्हा करण्याचा विचार येऊन नये, असे यावेळी अजित पवार म्हणाले.
विभागीय आयुक्त कार्यालयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
म्हणून शाळा सुरू करण्याचा निर्णय -
राज्य सरकारने चार ऑक्टोबरला राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील मान्यता मिळाली आहे. त्यानुसार कोरोना मुक्त झालेल्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन जरी शाळा घेतल्या तरी खूप मर्यादा येत होत्या. शेवटी शाळेतलं वातावरण, मुलांना एकत्र बसणे हा अनुभव महत्त्वाचा असतो. त्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे, असे पवार म्हणाले.
हे ही वाचा -Guidelines for Schools : शाळा सुरू झाल्यानंतर 'या' नियमांचं करावं लागेल पालन
इतर नागरिकांनाही स्विमिंग पूलमध्ये जाता येणार -
पुणे शहरात कोरोना हळूहळू नियंत्रणात येऊ लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर निर्बंध ही शिथिल करण्यात आले आहेत. व्यापार-उद्योग याबरोबर दुकानांच्या वेळाही वाढविण्यात आल्या आहेत. तर क्रीडांगण उद्यान खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर स्विमिंग पूल खेळाडूंना 2 डोसच्या अटींवर परवानगी दिली होती. आत्ता इतर नागरिकांनाही स्विमिंग पूलमध्ये जाता येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच त्यांच्यासाठी सुद्धा 2 डोसचे नियम लागू असणार आहेत.
दोन्ही डोसमधील अंतर कमी करावे -
लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याने केंद्र सरकारने दोन्ही डोसमधील अंतर वाढवलं होतं. पण आता मुबलक प्रमाणात लसीचा पहिला आणि दुसरा डोस उपलब्ध असल्याने 84 दिवसांचा गॅप केंद्राने कमी करावा, अशी देखील मागणी करण्यात येणार आहे.
त्यादिवशी ते घडायला नको होतं -
भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या वेळच्या काही राजकीय घडामोडी झाल्या, त्या व्हायला नको होती. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की कुणीही कुठेही जावं आणि दौरा करावा. मला आरोप-प्रत्यारोप आवडत नाही तर विकासाचं जे काही काम असतील ते करायला आवडते, असे देखील पवार यांनी यावेळी सांगितले.