पुणे - पुणे तिथे काय उणे हे नेहेमीच बोलले जाते. याची प्रचिती ही नेहेमी पुणेकरांच्या जगण्यापासून ते विविध उपक्रमातून पाहायला मिळतच असते. उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांनी पुणेकरांबाबत आलेला अनुभव आणि पुणेकरांबाबतचे मत गमतीशीर पद्धतीने सांगितले. ते तळजाई टेकडी येथील ( Taljai Tekadi work ) वन उद्यानातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की पुणेकरांसारखा स्वभाव जगात कुठेही पाहायला मिळणार ( Ajit Pawar on Pune citizen attitude ) नाही. एक रुपया शुल्क लावले तरी पुणेकर आंदोलन करतात. पिंपरी चिंचवड येथे 25 वर्षे काम असताना ( Ajit Pawar work in PCMC ) कधीही मला अडचण आली नाही. धडाधड काम करत होतो. कोणीही न्यायालयात गेले नाही. पण पुण्यात काहीही केले नाही, की लगेच न्यायालयात जातात. चर्चेतून मार्ग निघत असतो. माझी विनंती आहे की राजकारण जाऊ द्या. पण आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. मग तो कुठल्याही विचाराचा असो, असेदेखील यावेळी पवार म्हणाले.
वन विषयक कायद्याचे पालन होईल अशा विकास करावा
यावेळी पवार म्हणाले, वनक्षेत्राचा विकास करताना निसर्गाला धक्का न लावता त्या परिसराला अनुरूप विकासकामे करावीत. स्थानिक प्रजातीच्या वृक्षांना प्राधान्य द्यावे. तसेच नागरिकांना लाभ होईल. वन विषयक कायद्याचे पालन होईल, अशा पद्धतीने विकास करण्यात यावा. या प्रक्रियेत वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी, विविध सामाजिक संस्था, महानगरपालिकेलादेखील सहभागी करून घ्यावे. वनक्षेत्रातील स्वच्छता ठेवणे आणि येथील वन्यजीवांना सुरक्षित अधिवास मिळेल, याची दक्षता घेणेदेखील गरजेचे आहे.
हेही वाचा-युक्रेनहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरीच क्वारंटाईन केले जाणार - किशोरी पेडणेकर
पर्यावरण रक्षणावर विशेष भर
कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजनचे महत्व अधोरेखित झाले. ऑक्सिजन प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्यात आली. माणसाच्या आरोग्याच्यादृष्टीने कायमस्वरुपी ऑक्सिजन देणारी झाडे जगविणे महत्वाचे आहे. सरकारने वनक्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. वनक्षेत्र वाढविण्यासाठी आणि प्रदूषण कमी करून आरोग्यदायी पर्यावरण निर्मितीसाठी आवश्यक निधीदेखील देण्यात येत आहे. वारसा वृक्ष संवर्धनाकडेदेखील विशेष लक्ष देण्यात येत आहे. या कार्यात अभिनेता सयाजी शिंदे यांचे सहकार्य मिळत आहे. तळजाई परिसरातील ग्लिरिसिडीया प्रजातीचे वृक्ष काढून टप्प्याटप्प्याने स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
पक्षी आणि प्राण्यांनाही जगण्याचा हक्क
विकासाच्या प्रक्रिये येत वन्यजीवांचा अधिवासही टिकेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पक्षी आणि प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे. प्राण्यांची संख्या अलिकडच्या काळात कमी होत चालली आहे. पर्यावरण संतुलनासाठी प्राणी, पक्षी वाचावेत यासाठी वन विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. प्राण्यांच्या अनाथालयासाठी २२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तळजाई वन उद्यानासाठी ५ कोटींचा निधी देण्यात आल्याचे यावेळी पवार म्हणाले.
वन संवर्धनासाठी नागरिकांनी सूचना कराव्यात-
पर्यावरण रक्षण आणि वन संवर्धनाच्या कार्यात नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. वन विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत असले तरी नागरिकांनी उपयुक्त सूचना केल्यास त्याचाही विचार करण्यात येईल. हा समृद्ध नैसर्गिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. बहरलेला निसर्ग ही पुण्याची ओळख व्हावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पर्यावरण रक्षणासाठी ई-वाहनांचा उपयोग वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भीमराव तापकीर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, माजी महापौर प्रशांत जगताप, मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, उप वनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.