पणजी - गोव्यातील राजकारण्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे गोव्याची संपूर्ण देशात बदनामी होत आहे. अशा राजकारण्यांच्या प्रमाणपत्राची शिवसेनेला गरज नाही, असे गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी म्हटले आहे. सोमवारी गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्याला आज त्यांनी प्रत्युत्तर दिले.
कामत यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की राजकारणातील वाईट उदाहरण देण्यासाठी गोव्याचे उदाहरण दिले जाते. हा येथील सभ्य आणि सुशिक्षित नागरिकांचा अपमान आहे. तर शिवसेनेवर टीका करणारे मंत्री राणे आज ज्या भाजपमध्ये आहे, तो पक्षही शिवसेनेसोबत युती केल्यामुळेच 1994 मध्ये विधानसभेत पोहोचला, याचे बहुधा त्यांना विस्मरण झाले असावे.
शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित संघटना असल्यामुळे गोव्यात पक्षाचे बहुतेक पदाधिकारी ख्रिस्ती आहेत. मुंबईतही आहेत. याकडे दुर्लक्ष करत राणे यांनी आपले अज्ञान प्रकट केले आहे, असेही कामत यांनी म्हटले आहे.