पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यश म्हणजे लोकांनी दिलेला आशीर्वाद आहे. परंतु, पणजी विधानसभा आणि दक्षिण गोवा लोकसभेच्या जागेवर झालेल्या पराभवाचे दु:ख आहे. अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागु झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे डॉ. सावंत यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली. त्यामुळे पर्रीकर यांच्याशिवाय भाजप कशा प्रकारे निवडणुकीत यश प्राप्त करतो. विशेषतः विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत असल्याने त्या भाजपला मिळतात की नाही यावर गोवा सरकारचे भविष्य अवलंबून होते. त्यामुळे या निवडणुका भाजप बरोबरच मुख्यमंत्री म्हणून डॉ. सावंत यांची कसोटी पाहणाऱ्या होत्या. त्यामुळे गोमंतकीयांबरोबरच देशाचे लक्ष गोव्याकडे होते.
याविषयी बोलताना डॉ. सावंत म्हणाले, लोकांनी श्रीपाद नाईक यांना सलग पाच वेळा लोकसभेत पाठवून गोव्याच्या राजकारणात विक्रम घडवला आहे. चारपैकी तीन विधानसभा मतदारसंघ आणि उत्तर गोवा लोकसभा मतादरसंघात भाजप उमेवारांना विजयी केले आहे. मात्र, गेली पंचवीस वर्षे भाजपकडे असलेला पणजी मतदारसंघ राखण्यात आम्ही थोडे कमी पडलो. मात्र, जेव्हा पुन्हा येथे निवडणूक होईल तेव्हा जिंकण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहे. दक्षिण गोवा मतदारसंघात जिंकण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न केले. पण कुठे कमी पडलो हे समजलेले नाही. उत्तर गोव्यातील खाण पट्ट्यात मतदारांचा पाठिंबा लाभला. तर दक्षिण गोव्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. त्यामुळे पराभवाचे नेमके कारण कळलेले नाही.
आमचा भर लोकाभिमुख प्रशासन देण्यावर असेल, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, पुढच्या दोन महिन्यांत प्रशासन सुरळीत होईल. प्रशासनातील बदल लोकांना दिसून येतील. विधानसभा अधिवेशन जुलै महिन्यात होणार आहे. सरकारला आता कोणत्याही प्रकारची भीती नाही. आमच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे. घटकपक्ष सोबत आहेत. त्यामुळे पुढील कार्यकाळ पूर्ण करणार.
गड आला पण सिंह गेला - विनय तेंडुलकर
गोव्यातील भाजपचा विजय आणि एक विधानसभा, एक लोकसभा जागेवरील पराभवाचे विश्लेषण करतांना गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणाले, आमची स्थिती म्हणजे 'गड आला पण सिंह गेला' अशी झाली आहे. सामान्य कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री यांनी केलेल्या कामाचा परिणाम म्हणून आम्हाला हे यश आले आहे. परंतु, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील पराभव दुखदायक आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि लोकसंपर्क असलेला खासदार पराभूत झाला. याचे लोकांना आता दु:ख होईल. कारण ज्याची निवड केली आहे, तो उमेदवार काहीच काम न करता निवडून आलेला आहे.