नाशिक - नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने, आता शहरात दर बुधवारी करण्यात येणारी पाणीकपात आजपासून रद्द करण्यात आली आहे. मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी हा निर्णय घेतला आहे. मनपा प्रशासनाने सुरु केलेली पाणीकपात रद्द करण्यात आली असून, नागरिकांनी पाण्याचा वापर करताना काटकसरीने करावा, असे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.
'नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं मनपा प्रशासनाचं आवाहन'
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूह क्षेत्रामध्ये पावसाने ओढ दिल्याने, या धरणातील पाणीसाठा हा 30 टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता. परिणामी नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट आले होते. धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने, मनपा प्रशासनाने आठवड्यातील प्रत्येक बुधवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे शहरात, दर बुधवारी करण्यात येणारी पाणीकपात रद्द करण्यात आली असल्याची माहिती नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, गंगापूर धरण क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम असल्याने, नागरिकांनी पाण्याचा अपव्यय न करता पाण्याचे नियोजन करून काटेकोरपणे वापर करावा असे आवाहनही यावेळी प्रशासनाकडून करण्यात आले.
'दोन आठवड्यांपासून शहरात सुरू होती पाणी कपात'
जुलै महिना उजाडूनही नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली नव्हती. विशेष म्हणजे शहराची तहान भागवणऱ्या गंगापूर धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस न झाल्याने, शहराची पाण्याची गरज आणि धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा महापालिकेने आढावा घेत दोन आठवड्यांपासून शहरात दर बुधवारी पाणी कपात लागू केली होती. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने, गंगापूर धरणसाठ्यात मोठी वाढ झाली. त्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. सध्या धरणात 76 टक्के पाणी शिल्लक आहे. ही सर्व परिस्थिती बघता पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केल आहे.
'धरण पूर्ण क्षमतेने भरूही देता येत नाही'
शहराला पाणीपुरवठा करणारे दारणा धरण 100 टक्के भरले आहे. परंतु, मुकणे धरण अद्यापही 51 टक्केच भरले आहे. गंगापूर धरणातून 29 जुलैला तीन हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. नंतर 30 जुलैला पाच हजार क्युसेक्स पाणी सोडले. हा निर्णय मोठ्या प्रमाणात झालेल्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता. एकदम जोराचा पाऊस आला तर, कोल्हापुरसारखी पुरपरस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करता येत नाही. तसेच, धरण पूर्ण क्षमतेने भरूही देता येत नाही. ते 80 टक्क्यांच्या आसपास भरले की, जलसंपदा खाते पाणी सोडण्याबाबत निर्यण घेत असते, असेआयुक्त जाधव यावेळी म्हणाले.