नाशिक - नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सावरकरांचा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. साहित्य संमेलनात सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीचा ठाराव मांडण्याची मागणी सावरकर प्रेमींकडून केली जात आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
संमेलनाच्या प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याची मागणी
सावरकर प्रेमींनी साहित्य संमलेनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले आणि अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांना या मागणीचे निवेदनही दिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशिकच्या भगूरचे पुत्र असल्याने संमेलनाच्या प्रवेशद्वारास त्यांचे नाव देण्यात यावे, तसेच व्यासपीठावर सावरकरांची भव्य प्रतिमा असावी आणि तिचे पूजन करण्यात यावे असही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
सगळ्यांनी सबुरीने घेतले पाहिजे - भुजबळ
कोणाचे नाव द्यावे, कोणाचे नाही यासाठी साहित्य संमेलनाचे समिती आहे. ते योग्य ते निर्णय घेण्यास सक्षम असून ते निर्णय घेतील असे नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी म्हटले आहे. मला असे वाटते की, सगळ्यांनी सबुरीने घेतले पाहिजे. साहित्य संमेलन समितीला या सर्व गोष्टींची कल्पना असून ते योग्य ते निर्णय घेतील असे भूजबळ म्हणाले.