नाशिक- त्र्यंबकेश्वरमधील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रा उत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता, यंदा हा उत्सव होणार नसल्याचे प्रशासनाणे स्पष्ट केले आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ महाराज यांच मोठे स्थान आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो भाविक नाथ महाराजांच्या यात्रेसाठी राज्य भरातून त्रंबकेश्वर मध्ये दाखल होत असतात. यावर्षी ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान हा उत्सव होणार होता. मात्र, यात खंड पडणार आहे.
कमी वारकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेला परवानगी देण्याची विश्वस्त मंडळाची मागणी ...
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा पौष वद्य एकादशीला भरते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातुन दुरवरुन येणाऱ्या दिंड्या एक महिना, १५ दिवस आधीच येण्याचे नियोजन करतात. मानाच्या दिंड्या पालख्यांना एक महिना अगोदर निमंत्रण द्यावे लागते. यासाठी निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान ट्रस्टला नियोजन करावे लागते. जिल्हा प्रशासनाला यापूर्वीच पत्र व्यवहार करण्यात आला होता. यासाठी तातडीने प्रांताधिकारी तेजस चव्हाण , तहसीलदार दीपक गिरासे, उपविभागीय पोलीस उपधीक्षक भिमाशकंर ढोले, नायब तहसीलदार रामकिसन राठोड, मुख्याधिकारी संजय जाधव, संत निवृत्तीनाथ संस्थान अध्यक्ष पवन कुमार भुतडा, योगेश गोसावी, मधुकर लांडे, आदीच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. यावेळी समाधी संस्थान तर्फे कमी वारकऱ्यांच्या उपस्थित यात्रा भरविण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.
शेकडो वर्षांची ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून कमी वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या उत्सवाला परवानगी देण्याची मागणी मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे आता यात्रोत्सव मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत का असेना साजरा होणार की कोरोनामुळे वारकऱ्यांना आपल्या आराध्याच्या यात्रेला मुकाव लागणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.