नाशिक - कोरोना काळात अनेकांना आपले आप्तेष्ठ गमवावे लागले. कोणाचा भाऊ गेला तर कोणाची बहिण गेली. त्यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रक्षाबंधनाचे आयोजन करुन भावनिक आधार दिला आहे. भाऊ-बहिण गमावलेल्यांसोबत नाशिकमध्ये मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला आहे. त्यांच्या दुःखात सहभागी होत, त्यांना वाईट व एकटे वाटू नये म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. यावेळी महिला कार्यकर्त्यांकडून राख्या बांधण्यात आल्या. या अनोख्या रक्षाबंधनाची चर्चा सर्वत्र होत आहे.
पदाधिकाऱ्यांनी साजरे केले रक्षाबंधन
मनसे हा पक्ष नेहमी महिलांचे रक्षण करत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने एक आगळावेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांनी आपले जवळचे भाऊ-बहीण गमावले आहेत. रक्षाबंधनानिमित्त या महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना राखी बांधली आहे. या महिलांचे आम्ही यापुढेही रक्षण करू, असे मत जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी यावेळी व्यक्त केले आहे.