नाशिक - आदिवासी विकास योजनांमधून विकासाचे काम सुरू आहे, पेसासारख्या कायद्यांनी त्याला गती मिळाली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. कळवण तालुक्यातील गुलाबी गाव (भिंतघर) येथील एकात्मिक आदिवासी जिल्हा प्रकल्पाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनांतर्गत बांधलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
![koshyari](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-rajypalprogram-7204957_03022021184309_0302f_1612357989_1097.jpg)
पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत
गावात कोश्यारी यांचे आगमन होताच पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आले. गुलाबी रंगाने सजलेली घरे आणि पारंपरिक वेशात असलेले गावकरी आणि त्यांच्याकडून झालेल्या उत्स्फूर्त स्वागताने राज्यपाल कोश्यारी भारावले. त्यानंतर सभास्थानी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आणि गिर्यारोहक हेमलता गायकवाड यांच्या हस्ते पारंपरिक वाद्य पावरी आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
'महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न होण्याची गरज'
कोश्यारी म्हणाले, की निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर आहे. येथील आदिवासी बांधव विकासाची संधी शोधत आहेत त्यांना ती संधी पेसासारख्या कायद्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. याशिवाय कसण्यासाठी वनपट्टे त्यांना देण्यात येत आहेत, त्याचाही उपयोग हे बांधव करत आहेत. या भागात बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
![koshyari](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-rajypalprogram-7204957_03022021184309_0302f_1612357989_1078.jpg)
'तुम्हा लोकांत मला देव दिसतो'
राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी मनमोकळा संवाद साधला. मी सुद्धा पहाडी भागातून आलो आहे. त्यामुळे तुमची जीवनशैली मला माहिती आहे. त्यामुळेच मला शहरी भागापेक्षा अशा कार्यक्रमांना येणे आवडते. तुम्हा लोकांमध्येच मला देव दिसतो, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब वाघेरे, बंडू कडाले आणि तुळशीदास जाधव यांना वन पट्टे सातबाराचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांपैकी विमल जाधव यांना प्रातिनिधीक प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
![koshyari](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-rajypalprogram-7204957_03022021184309_0302f_1612357989_956.jpg)
'पाण्याचे साठे निर्माण करण्याची गरज'
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले, की यांनी या भागात पावसाळ्यात सतत चार महिने पाऊस असतो. मात्र, ते पाणी वाहून जाते. त्यामुळे येथील विकास गतीने होण्यासाठी पाण्याचे साठे निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. विशेष बाब म्हणून त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उप विभागीय अधिकारी संदीप आहेर, एकात्मिक आदिवासी जिल्हा प्रकल्पच (कळवण) संचालक विकास मीना, अपर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर आदींची यावेळी उपस्थिती होती.