नाशिक - कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना केंद्राकडून चार लाख रुपयांचा मदतनिधी देण्यात येत असल्याचे संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही मदत मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात १८०० अर्ज प्राप्त झाले आहेत. ही मदत मिळावी यासाठी मृताचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खेट्या मारत आहेत. मात्र, ही माहिती खोटी असून अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
![fake news in nashik on social media](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-fakenews-mh10018_29082021142349_2908f_1630227229_180.jpg)
मदतीसाठी प्रशासनाकडे आतापर्यंत १८०० अर्ज प्राप्त -
सोशल मीडियावर व्हायरल होणार्या या संदेशामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मदत मिळविण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. आतापर्यंत मदतीसाठी प्रशासनाकडे १८०० अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, कोविडमुळे अनेकांनी कुटुंबातील सदस्य गमावले. या काळात ज्या बालकांनी आपले आई-वडील गमावले, त्यांना शासनाकडून मदत देण्यात येत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे. यात राज्य आपत्ती निवारण निधीच्या माध्यमातून कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात असल्याचे म्हटले आहे. परंतु, या संदेशामागील सत्यता तपासल्यानंतर ही अफवा असून असा कोणताही निर्णय प्रशासनाला प्राप्त झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केल आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे देखील म्हटले आहे. मात्र तरीही मदतीच्या अपेक्षेने नागरिक आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात गर्दी करत आहेत. आतापर्यंत सुमारे १८०० नागरिकांनी मदतीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
हेही वाचा - Tokyo Olympics : रौप्य पदक जिंकणाऱ्या भाविनाबेन पटेलचे राष्ट्रपती कोविंदसह मोदींनी केलं कौतुक