नागपूर - अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यासह आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरोप-प्रत्यारोपानंतर नार्कोटिक ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावण्यात आलेले आहे. या संपूर्ण घटनाक्रमावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की एखाद्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना केसशी संबंधित कुणीही अधिकाऱ्यावर आरोप केले असतील तर ते आरोप तपासण्याचे काम तपास यंत्रणांकडून केले जाऊ शकते. त्यातूनच आरोपांमध्ये सत्यता आहे की नाही हे स्पष्ट होईल, असे देखील ते म्हणाले आहेत. समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे अशी चर्चा सुरू आहे. मात्र आपण घाईघाईने अशा निष्कर्षाला येणे चुकीचे ठरेल असे उज्वल निकम म्हणाले आहेत. साक्षीदाराने केलेले आरोपांच्याबद्दल विचारपूस करणे म्हणजे चौकशी सुरू नाही आणि समीर वानखेडे यांच्यावर अद्याप तसे कोणतेही आरोप ठेवण्यात आले नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
'कालचक्र सुरूच राहणार'
समीर वानखेडे यांची बदली होणार अशी चर्चा आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांच्यानंतर दुसरे पंतप्रधान आले. हे कालचक्र सुरूच राहणार आहे. एखाद्या गुन्ह्याचा तपास कामाचा महत्त्वाचा टप्पा असताना एखादा तपास अधिकाऱ्याला नाउमेद करणे, हे तपासाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. त्यामुळे संबंधित राजकीय पक्ष, संबंधित राजकीय व्यक्ती आणि तपास अधिकारी यांनी देखील गंभीर गुन्ह्याचा तपास करताना सावधगिरी बाळगणे पाहिजे.
'व्हाट्सएप चॅट प्राथमिक पुरावा आहे,पण...'
व्हाट्सअप चॅट हा प्राथमिक सकृद्दर्शनी पुरावा आहे. त्यातून गुन्हा सिद्ध होत नाही. गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुष्टीदायक पुरावा लागतो. व्हाट्सअप चॅटच्या आधारे कुणी गुन्हा घडला असल्याचा दावा करत असले, तर त्या अधिकाऱ्याला आणखी सखोल तपास करावा लागेल. परंतु व्हाट्सअप चॅट हाय प्राथमिक सकृद्दर्शनी पुरावा आहे.
हेही वाचा - "मी गुपचुप तुझ्याकडून गांजा घेईल" अनन्या-आर्यनचे "ते" कथित व्हाटसअॅप चॅट आले समोर!