नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या कपाशी, संत्रा आणि धान पिकाची पाहणी केली. विदर्भातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेत मालाचे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लक्ष घालावे यासाठी माझे प्रयत्न राहाणार आहे. मी कृषीमंत्री आणि अर्थ मंत्री यांच्यासोबत चर्चा करण्याच्या प्रयत्नात आहे. पीक कर्ज माफ करण्यासाठी कोणती योजना करता येईल का, यासाठी चर्चा करणार आहे. आगामी वर्षासाठी केंद्र सरकारकडून काही मदत देता येईल का? यावर केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही पवार म्हणाले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पवार म्हणाले, संत्र्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे ६०ते७० टक्के संत्री गळाली असून जो माल झाडावर शिल्लक आहे, त्याचा आकार लहान आहे. या पावसाचा धान उत्पादनावरही विपरीत परिणाम झाला आहे. धानात दानाच भरलेला नाही, तर कपाशीच्या झाडांची वाढ चांगलीच झाली असली तरी बोंडांची संख्या कमी प्रमाणात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेल्या नुकसानीच्या माहिती नुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. साधारणता ४४,२१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणांनी ६,८०० हेक्टरी मदत देण्याचा आकडा दिला आहे.
फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण वर्षाचे पीक बाधित झाले आहे. औरंगाबाद-जालना जिल्ह्यातही असेच नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी योजना करता येईल का आणि आगामी वर्षासाठी केंद्र सरकारकडून काही मदत देता येईल का, यावर केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पवार म्हणाले.