नागपूर : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना, ओबीसींच्या आरक्षणावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( Bawankule Criticism on Bhujbal ) आणि काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार ( Bawankule Criticism on Vijay Wadettiwar ) यांच्यावर जोरदार टीका केली. सुप्रीम कोर्टाने सुनावल्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी बांठिया आयोग आणि डेटा गोळा करण्याचे 90 टक्के काम हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले आहे. तर मग विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ अडीच वर्षे झोपले होते का? दोन वर्षे काहीच केले नाही. हे ओबीसींना काय न्याय देणार? अशा उद्विग्न सवाल त्यांनी या नेत्यांना केला. तसेच आताचे शिंदे आणि फडणवीस सरकार ओबीसींना न्याय देईल, असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना दर्शवला. ( BJP leader Chandrasekhar Bawankule in Nagpur )
छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यावर टीका : ओबीसींच्या आरक्षणावर आता सुप्रीम कोर्टाने सुनावल्यानंतर आरक्षणासाठी बांठिया आयोग आणि डेटा गोळा करण्याचे काम जर 90 टक्के झाले आहे, तर छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार झोपले होते का? असा सवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर शब्दांत ओबीसींचे नेते म्हणवणारे छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या टीका केली आहे. भुजबळ मोर्चे काढत राहिले आणि वडेट्टीवार संमेलन घेत राहिले आणि आरक्षणाचा प्रश्न तसाच राहिला. अशा प्रकारची यांची कार्यपद्धती. महाविकास आघाडीच्या या नेत्यांना ओबीसींच्या आरक्षणाविषयी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याचा अधिकार नाही. भुजबळ हे समता परिषदेचे मोर्चे काढत राहिले आणि वडेट्टीवार संमेलन घेत राहिले. त्यामुळे फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, असे म्हणत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनावले.
शिंदे-फडणवीस सरकार ओबीसींना न्याय देईल : महाविकास आघाडी सरकारच्या काळात निवडणुका विनाओबीसी आरक्षणाच्या झाल्या; पण फडणवीस आणि शिंदे सरकारच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. आता तुम्ही आरोप कसा काय करता, असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेल्याने हे बावचळले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धरून काही तरी बोलत असतात. पण, शिंदे आणि फडणवीस सरकार ओबीसींना नक्की न्याय मिळेल, असाही विश्वास बोलून दाखवला.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसींना आरक्षण मिळणार : महाविकास आघाडी सरकार असताना हे करू ते करू हॉस्टेल बांधू, अशा पोकळ घोषणा केल्या. पण, ओबीसींसाठी काहीही केले नाही. यामुळे ओबीसी जनता तुम्हाला सोडणार नाही. सुप्रीम कोर्टात 19 जुलैला सुनावणी होत आहे. यात खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्ट ताकदीने बाजू मांडणार आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर हा डेटा तयार केला आहे. यात ओबीसींना आरक्षण मिळेल, असा विश्वास आहे.
सत्ता हातून गेल्याने संजय राऊत बावचळले : सत्ता हातून गेल्याने संजय राऊत बावचळले आहे. म्हणून त्यांना नागपुरात यावे लागले. उद्धव ठाकरे सरकार असते तर गडचिरोलीत पूर आला म्हणून फेसबूक लाईव्ह केले असते. पण, शिंदे आणि फडणवीस सरकारने स्वतः जाऊन रात्री थेट गडचिरोलीत पोहोचत पाहणी केली. शिंदे - फडणवीस सरकार पुढील अडीच वर्षांत एवढे काम करेल की, संजय राऊत असो की महाविकास आघाडीमधील अन्य नेते असो त्याना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा शब्दांत भाजपचे नेते बावनकुळे यांनी हल्ला चढवला. तसेच, सरकार सत्तेत आल्या आल्याच पेट्रोल - डिझेल स्वस्त, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवड असे अनेक चांगले निर्णय या सरकारने घेतल्याचाही उल्लेख बावनकुळे यांनी केला.