नागपूर - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असून ते कोणाच्या तरी दबावाखाली अधर्मी झाल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. हे सरकार 12 कोटी जनतेच्या भावनांशी खेळत आहे, असेही बावनकुळे म्हणाले. मंदिर खुले करावे, या मागणीसाठी शंखनाद आंदोलन कोराडी येथील महालक्ष्मी जंगदंबा माता मंदिरात करण्यात आले, त्यावेळी त्यांनी उपरोक्त टीका केली. यावेळी आमदार टेकचंद सावरकर हे देखील उपस्थित होते.
कोणाला खूष करण्यासाठी काम करता?
श्रीकृष्ण जन्माष्टमी देशभरात साजरी होत आहे. अनेक मंदिरे खुली असताना महाराष्ट्रात मंदिर का खुले करण्यात आले नाही? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी शंखनाद करत सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. हे सरकार अधर्मी झाले आहे का? कुठे गेला त्यांचा धर्म, हिंदुत्व कोणाच्या दबावाखाली सोडले, कोणाला खूष करण्यासाठी काम करता? अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
हेही वाचा - दिल्लीला गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला नागपूर पोलिसांनी पकडले, कारसह ९९ किलो गांजा केला जप्त
कोरोनाचे निर्बंध असताना दारूची दुकाने सुरू आहेत. नियमांना डावलून मोठ्या प्रमाणात विनामस्क लोकांची गर्दी दारू दुकानांवर होत आहे. मग मंदिरे का खुली केली नाहीत? मंदिरात कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास तयार आहे. गर्दी टाळण्यासाठी एक एक भाविकांना मंदिरात सोडावे. मंदिरांच्या भरवशावर असलेल्या अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. जर नियमाचे भंग होत असेल तर कारवाई करा, पण मंदिरे खुली करा, अन्यथा दारूची दुकाने बंद करा, अशी भूमिका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.
येत्या सात दिवसांत सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. सरकार ऐकत नसल्यास आम्ही मंदिरे खुली करू, सरकारला वाटत असेल तर त्यांनी कारवाई करावी, असे ही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
हेही वाचा - झालेल्या विकास कामांची आठवण ठेवा बाकी समझनेवालों को इशारा काफी है - नितीन गडकरी