मुंबई - गेल्या काही वर्षांमध्ये धनदांडग्यांनी विविध बॅंकांचे साडेपाच लाख कोटी रुपये बुडवले गेले. आता 28 बँकांना गुजरातच्या शिपिंग कंपनीने जवळपास 22 हजार कोटीचा चुना लावला ( Gujrat Shipping Company Bank Fraud ) आहे. काही मूठभर लोक गैरफायदा घेत कष्टकरी आणि सामान्य माणसाने कष्टाने जमा केलेले पैसे लुबाडत आहेत. सामान्य माणसं बँकेकडून कर्ज घेताना त्यांच्याकडून अनेक कागदपत्र घेतली जातात. तारण ठेवलं जातं. मग धनदांडग्यांकडून त्यांची मालमत्ता किंवा जमीन कर्ज घेताना तारण का ठेवल्या जात नाहीत? असा सवाल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला ( Ajit Pawar On Bank Scam ) आहे. आज द महाराष्ट्र मंत्रालय अँड अलाईड ऑफिस को-ऑपरेटिव बँक लिमिटेड ( The Maharashtra Mantralaya and Allied Office Co-operative Bank Ltd ) मंत्रालय शाखेच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं.
प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार
शिवसेना खासदार संजय राऊत आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे मात्र आज पत्रकार परिषदेत ते काय म्हणणार आहेत याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं अजित पवार ( Ajit Pawar On Sanjay Raut ) म्हणाले.
वीज महामंडळ खाजगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही
वीज महामंडळ खासगीकरणाची सध्या चर्चा होत असली तरी, अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. तसेच गरिबांना वीजपुरवठा असताना विजेचा दर वाढू नये याचा सातत्याने विचार केला जातो. मात्र खाजगी करण्याबाबत कोणताही प्रस्ताव आल्यास त्याचा विचार केला जाईल असं अजित पवार यावेळी म्हणाले ( Ajit Pawar On Mahavitaran Privatization ) आहेत.