मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे सरकार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ते चैत्यभूमी (Uday Samant Chaityabhumi Visit) येथे आले होते.
बाबासाहेबांनी आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. बाबासाहेबांच्या मूलमंत्राची तंतोतंत आठवण मला होत आहे. त्यांची नितांत गरज आहे. जगभरात कोरोनाचे सावट आहे. त्याविरोधात संघटित झालं पाहिजे तरच यावर मात करू शकू. आपल्याला मुकाबला करायचा असल्यास सगळ्यांना काही गोष्टी शिकाल्या लागतील असेही ते म्हणाले.
गोंधळ हा गैरसमजातून
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी स्मारकात जात असताना काही जणांना अडवण्यात आलं. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. अभिवादनासाठी स्मारकात जात असताना अडवलं गेल्यानं काहीसा गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी पोलिस आणि उपस्थित अनुयायांमध्ये बाचाबाची आणि काहीशी झटापट झाली. या गोंधळाविषयी बोलताना मी घडलेल्या प्रकाराची स्वत: माहिती घेतली. आणि तो गैरसमजातून निर्माण झाल्याचे समजले. असेही उदय सामंत म्हणाले.
स्मारक लवकरच पूर्ण होईल
इंदू मिल येथील स्मारकासंबंधी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर सामंत म्हणाले, डॉ. बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण करणे हे उद्धव ठाकरे सरकारची जबाबदारी आहे, ती पूर्ण केली जाईल. त्यासोबत सामंतांनी सांगितले, की लोणेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागील 40 वर्षांची मागणी ठाकरे सरकारने पूर्ण केली आहे. सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने रिसर्च सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. हे सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे सरकार आहे. त्यामुळे इंदूमिल येथील स्मारकाचा प्रश्नदेखील लवकरात लवकर सुटेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
तेरा कुलगुरूंची बैठक
उद्या (मंगळवारी) अकरा वाजता तेरा विद्यापीठांच्या कुलगुरू सोबत बैठक होणार या बैठकीतून प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेतली जाईल. जिल्ह्यात नवीन व्हेरियंटची काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली जाईल. विद्यार्थी - पालक प्राध्यापक बाधित होणार नाही यासाठी ठोस पावले उचलली जातील. मात्र महाविद्यालय बंद होतील असा कोणताही मुद्दा नाही.
हेही वाचा - Mahaparinirvan Day 2021 : महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना मास्क व सॅनिटायजरचे वाटप