मुंबई - आझाद मैदानावर राज्यातील संगणक परिचालक गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करत होते. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांनी आझाद मैदानातून हाकलून काढले. या दरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे. तसेच संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना सुद्धा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर आझाद मैदानातील सगळे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे आंदोलक सरकारवर नाराज आहेत आणि याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे आणि त्यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल की, राज्य सरकारच्या संवेदना पूर्णपणे हरपल्या आहेत. आझाद मैदानात आंदोलन सुरू आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना लाठ्यानी फोडून काढण्याचं काम सुरू आहे. काल संगणक परिचालक हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर गेले असता त्यांना मारण्यात आले. एवढी मोगलाई महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच नव्हती.आताही शिक्षक आंदोलन करत आहे. इकडून निघा नाहीतर लाठी चार्ज करण्यात येईल, असे शिक्षकांना धमकवण्यात आले. या राज्यात हिटलरशाही आहे की काय? आंदोलकांना न्याय द्याचे दूर त्याचे म्हणणे ऐकून घेऊन सौजन्याने वागणूक देण्याची भूमिका लोकशाहीमध्ये हवी. सत्तेचा माज आणि मस्ती या सरकारला एवढी आहे की, आंदोलकांवर अत्याचार यापूर्वी कधीच झाले नाहीत, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.