मुंबई - कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री परब यांनी केली. शिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढिवण्यात आल्याचे परब यांनी जाहीर केले.
हेही वाचा - यंदा वरुण राजाचे होणार दमदार आगमन, 101 टक्के सरासरी पावसाचा अंदाज
७३ वा वर्धापनदिन
’प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरुदावली मिरवणारी आणि ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेली लालपरी अर्थात एसटीने ७४ व्या वर्षात पदार्पण केले. ग्रामीण, तसेच शहरी भागातील चाकरमान्यांच्या हृदयात कायम स्थान असलेल्या एसटीचा आज ७३ वा वर्धापनदिन पार पडला. एसटीच्या वर्धापदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतानाच परब यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या महामारीत एसटी महामंडळाच्या ज्या कोरोना योद्ध्यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दुरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील महामंडळाच्या विविध अधिकाऱ्यांशी बोलताना परब यांनी कामगारवर्गाला मोठा दिलासा देत आश्वस्त केले.
५० लाख रुपयांच्या सरकारी योजनेची मुदत वाढ
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्याची राज्य सरकारने योजना घोषित केली होती. सरकारची ही योजना गेल्यावर्षी महामंडळाच्या वर्धापनदिनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली होती. या योजनेची मुदत ३० डिसेंबरपर्यंत होती. मात्र, शासनाने या योजनेचा कालावधी नंतर ३० जूनपर्यंत वाढवला. परंतु, राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा कालावधी वाढवला नव्हता. त्यामुळे, वर्धापनदिनाचे औचित्य साधत परब यांनी हा कालावधी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील ३० जून २०२१ पर्यंत वाढविला असल्याचे घोषित केले. मात्र, कोरोनामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, जे निकषात बसत असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे मदत दिली जाईल. मात्र, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रुपयांची मदत देण्याचे परब यांनी जाहिर केले.
एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न
कोरोनामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून महामंडळाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे सांगतानाच महामंडळासमोर कितीही अडचणी आल्या तरी एकाही कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागणार नाही, अशा शब्दात परब यांनी कामगारांना आश्वस्त केले. सद्या एसटी प्रतिकुल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असली तरी येत्या काही वर्षांमध्ये एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना हाती घेतल्या जातील, असे सांगतानाच राज्यातील सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी पुन: एकदा उभारी घेईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रतिदिन १ कोटी रुपयांचा महसूल मिळले
मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मोठे अर्थचक्र असलेल्या या राजधानीत कोरोनाकाळात प्रवासी वाहतुकीचा पडलेला भार कमी करण्यासाठी बेस्टच्या मदतीला एसटी धावून आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी सुमारे एक हजार एसटी मुंबईच्या रस्त्यांवर धावत होत्या. त्यासाठी सुमारे चार हजार चालक व वाहक रस्त्यांवर उतरले होते. या सेवेच्या माध्यमातून महामंडळाला प्रतिदिन १ कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी केवळ त्यांच्या आरोग्याचा विचार करून बेस्टच्या सेवेतून एसटी बसेस काढून घेण्यात आल्याचे परब यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या वारसांना सहा महिन्यांत नोकरी
कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कोरोना वॉरियर्स म्हणून एसटीचा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला होता. मात्र, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी प्रशासनाला दिले.
महाकार्गोच्या चालकांना १५० रुपये भत्ता
कोरोना काळात गेल्यावर्षी एसटी महामंडळाने व्यावसायिक मालवाहतूक क्षेत्रात दमदार पदार्पण केले. खासगी वाहतुकीच्या तुलनेत किफायतशीर दर असल्याने एसटीची ’महाकार्गो’ ही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली आहे. मालवाहतूक करताना चालकांना अनेकदा परगावी जावे लागते. तेथे त्यांना अनेकदा मुक्काम करावा लागतो. अशावेळी त्यांना पदरमोड करून आपला खर्च भागवावा लागतो. त्यामुळे, अशा चालकांना परगावी मुक्काम करावा लागल्यास त्यांना सरसकट १५० रुपये प्रतिदिन भत्ता देण्याची घोषणा परब यांनी केली. त्यामुळे, या चालकांची ओढाताण होणार नाही याची काळजी महामंडळ आजपासून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठळक वैशिष्टये…
- प्रवासी ग्राहक हा दैवत असून त्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी राज्यातील तालुक्यांना जोडल्या जाणाऱ्या काही १०० प्रमुख स्थानकांवर लवकरच आरओच्या माध्यमातून स्वच्छ पाणी देणार.
- एसटी स्थानकांवर मोठी स्वच्छतागृहे बांधणार. या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी थोडासा दर आकारून लोकांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येईल. त्या दृष्टीकोनातून येत्या काही दिवसांत योजना आणली जाईल. तसेच, बसस्थानकांचा परिसरही स्वच्छ ठेवला जाईल.
- प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य शासनाने नवीन बसगाड्या घेण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. येणाऱ्या काळात जवळपास अडीच हजार गाड्या घेणार आहोत. यामध्ये पर्यावरवणपूरक अशा इलेक्ट्रिक बस, एलएनजी, सीएनजी, साध्या तसेच आराम गाड्यांचा समावेश असेल.
- राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध केलेल्या योजना, सेवा, तसेच महामंडळाची विविध माहिती अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहचवण्यासाठी एसटीने ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम व टेलिग्राम या समाजमाध्यमांवर आपले स्वतःचे अधिकृत खाते उघडले आहे.
हेही वाचा - म्यूकरमायकोसिसमुळे मुंबईत 'अब तक ५६' रुग्णांचा मृत्यू