मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे पुन्हा एकदा जगभरात कोरोनाचे निर्बंध कडक करण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर येणाऱ्या विदेशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत राज्य सरकारने पुन्हा एकदा विचार करावा अशा आशयाचे निवेदन आज अबू आझमी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
दुसऱ्या विमानतळावर उतरुन वाहनाने मुंबईत येतायत प्रवासी..
महाराष्ट्र सरकारच्या नियमावलीनुसार परदेशातून येणाऱ्या लोकांना सात दिवस किंवा चौदा दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा याबद्दल अबू आझमी यांनी निवेदन केले आहे. यासंदर्भात बोलताना अबू आझमी म्हणाले, की गोवा, बंगळुरू, अहमदाबाद आणि दिल्ली या एअरपोर्टवरून आल्यानंतर बाय रोड मुंबईत आल्यानंतर त्या प्रवासाला क्वारंटाइन केले जात नाही. परंतु याउलट परदेशातून मुंबई एअरपोर्टला आल्यानंतर स्वतःचे पैसे खर्च करून चौदा दिवस त्याला क्वारंटाइन राहावे लागणार, आणि तोच व्यक्ती दुसऱ्या एअरपोर्टला येऊन तेथून मुंबईला आला तर त्याला कसल्याही प्रकारचे क्वारंटाईन केले जात नाही. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसार आपण कसा रोखणार आहोत? असा प्रश्न अबू आझमी यांनी उपस्थित केला.
![State govt should re think the decision of quarantining foreigners in Mumbai says Abu Azmi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_25122020225932_2512f_1608917372_523.jpg)
परदेशातून आलेल्यांवर अन्याय..
जे लोक परदेशातून आपल्या देशात येतात, ते सुट्टी मध्ये आपल्या परिवाराला भेटण्यासाठी येत असतात. विदेशात मेहनत करून, पैसे कमवून इथे आपल्या कुटुंबासाठी पालनपोषणासाठी खर्च करतात. अशा प्रवासी वर्गालाही आपल्या पैशाने क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. तो प्रवासी परदेशातून थेट मुंबईला न येता अहमदाबाद, दिल्ली, बंगळुरू किंवा अन्य राज्यांमधून बस किंवा रेल्वेने मुंबईत आला तर त्याचा जास्त पैसा होत आहेच. शिवाय कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या मुख्य हेतूलाही हरताळ फासली जात आहे. त्यामुळे मी असे समजतो की तुम्ही या लोकांवर खूप मोठा अन्याय करत आहात. असेही अबू आझमी यांनी आपल्या निवेदनात लिहिले आहे.
हेही वाचा : औरंगाबादमध्ये ब्रिटनहून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह, तर १३ जणांचा लागेना पत्ता