मुंबई - ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे आज शुक्रवार(दि. 21 जानेवारी)रोजी पहाटे मुंबईत नानावटी रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. (Senior journalist Dinkar Raikar passes away) रायकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात ५० वर्षांहून अधिक काळ सक्रियपणे काम केले आहे. मराठी पत्रकारितेत त्यांचे मोठे योगदान आहे. दरम्यान, रायकर यांच्या निधनाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक हरपला, अशा शब्दांत विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली होती
रायकर यांना डेंग्यू आणि करोनाचा संसर्ग झाला होता. (Marathi journalism On Dinkar Raikar) त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यामुळे उपचारानंतर त्यांचा डेंग्यू बराही झाला होता. परंतु, त्यानंतर फुप्फुसातील संसर्ग काही प्रमाणत वाढला होता. त्यावर नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, गुरुवारी रात्री त्यांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
अनेक पुरक्कार देऊन गौरवण्यात आले
दिनकर रायकर यांना पत्रकारिता क्षेत्रात ५० वर्षांहून अधिक पर्षांचा अनुभव होता. त्यांनी इंडियन एक्स्प्रेससह विविध दैनिकांत काम केले आहे. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. (Dinkar Raikar passes away) या काळात त्यांना अनेक पुरक्कार देऊन गौरवण्यात आले होते. पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
नवनवीन आशय संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली
पत्रकारितेच्या क्षेत्रात मुल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दिवंगत रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढ्यांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरीत्या बजावली. त्यामुळे मराठी पत्रकारितेच्या मुल्यांचे जतन आणि जगभरातील आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. नवनवीन आशय संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी उभी राहिली, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
साहित्य क्षेत्राची मोठी हानी आहे
'ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. दिनकर रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. राज्याच्या विकासप्रक्रियेत त्यांनी महत्वाचे योगदान दिले. युवा पत्रकारांना मार्गदर्शन केले. तसेच प्रोत्साहन दिले. पत्रकारितेत तरुणांच्या पिढ्या घडवल्या. त्यांचे निधन ही राज्याच्या पत्रकारिता, साहित्य क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा - उच्चशिक्षित भावंडांची पडीक जमीनीशी झुंज, संत्राचे घेतले दीड कोटीचे उत्पन्न