मुंबई - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही मोदींना अजून बरंच काम करायचे बाकी आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर अविश्वास नाही. जर सरकारचा लेखाजोखा पाहिला तर पंडित नेहरूंपासून ते राजीव गांधी या काळात देश उभा राहिला आहे, या देशांमधील अनेक प्रकल्प अनेक योजना त्या काळातल्या दिसत आहेत. मागच्या काळाच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
पश्चिम बंगाल आणि केंद्राचा संघर्ष हा सुरू राहणारच आहे. ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळ या संदर्भात जो मुद्दा उचलला आहे, त्यावर मोदी यांनी विचार केला पाहिजे. केंद्र सरकारने कुठलाही वाद स्वतःहून उकरून काढला नाही पाहिजे, मोदी हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्याला त्यांनी समान न्याय दिला पाहिजे, असेही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
असे किती काळ चालणार-
परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात नाशिकमधील निलंबित परिवहन अधिकाऱ्याने घोटाळ्याचा आणि वसुलीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. यावर बोलताना राऊत यांनी सांगितले की, अशा प्रकारचे आरोप विरोधी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने होत असतात. त्यातून मंत्र्यांचे राजीनामे मागितले जातात, असे किती काळ चालणार आहे. या प्रकरणात काही तथ्य नाही, याचे उत्तर स्वतः अनिल परब देतील असेही राऊत यावेळी म्हणाले.