मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत ५ आणि ६ जुलै हे दोन दिवस चालणार आहे. विधानभवनात येणाऱ्या प्रत्येकाला आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. विधान भवनात आज उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य शासनाने दिली.
पावसाळी अधिवेशनासाठी आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक -
दोन्हीही सभागृहांचे सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि वाहनातून मुंबईत येणारे सहप्रवासी अशा सर्वांनी सोयीच्या ठिकाणी मान्यताप्राप्त लॅबमध्ये दिनांक ३ किंवा ४ जुलै, २०२१ या निर्धारित वैध कालावधीसाठीची RT-PCR चाचणी करून त्याचा अहवाल विधानभवन प्रवेशासाठी सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. लसीकरणातील पहिला वा दुसरा डोस घेतलेल्यांना तसेच कोविड-१९ संदर्भातील प्रतिपिंड (अँटीबॉडी) चाचणीचा सकारात्मक अहवाल असणाऱ्यांना सुध्दा RT-PCR चाचणी करणे अनिवार्य राहणार आहे.
उच्चस्तरीय बैठकीत निर्णय -
मागील अधिवेशनांप्रमाणे विधान भवन प्रवेशद्वाराजवळील मंडपात दिनांक ३ आणि ४ जुलै २०२१ रोजी, सकाळी ९.०० ते सायं. ६.०० यावेळेत RT-PCR चाचणीची सुविधा सर्व संबंधितांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड-१९ संदर्भातील लसींचा पहिला अथवा दुसरा डोस घेतलेल्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असली तरी काही जण कोरोना विषाणूचे वाहक असू शकतात. त्यामुळे दोन्हीही डोस घेतलेल्यांना सुध्दा RT-PCR चाचणी इतरांच्या सुरक्षिततेसाठी करणे, अत्यावश्यक असल्याचे या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव, राजेन्द्र भागवत, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. तात्याराव लहाने, जे. जे. रुग्णालय समुहाचे अधिष्ठाता
डॉ. माणकेश्वर, मुंबई महापालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, डॉ. प्रणिता टिपरे, डॉ. संतोष गायकवाड, विधानमंडळाचे विशेष कार्य अधिकारी, डॉ. अनिल महाजन, अवर सचिव, रविंद्र जगदाळे उपस्थित होते.