मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला होता. हा दिलासा 22 जूनपर्यंत कायम राहणार आहे. या प्रकरणाची सुनावणी घेत असलेलं न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांचं कोर्ट आज चालू नसल्यानं निर्णय घेण्यात आला.
रश्मी शुक्लांनासुद्धा दिलासा -
मुंबई उच्च न्यायालयाने फोन टॅपिंग प्रकरणी एफआयआर रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांची याचिकाही तूर्तास तहकूब केली आहे, त्यामुळे रश्मी शुक्ला यांनासुद्धा दिलासा मिळाला आहे. या आधी परमबीर सिंह यांना अॅट्रोसिटी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून 15 जूनपर्यंत दिलासा दिला आहे. तूर्तास अॅट्रोसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, अशी राज्य सरकारने उच्च न्यायालयात ग्वाही मागील सुनावणीत तपास यंत्रणांकडून दिली होती. मात्र, तोपर्यंत परमबीर सिंह यांनी तपासयंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करावे, अशी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात विनंती केली. मात्र, तोपर्यंत याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून या प्रकरणाशी संबंधित याचिका मागे घ्यावी. एका प्रकरणात एकाच वेळी दोन ठिकाणी दिलासा मागता येणार नाही, अशी सूचना उच्च न्यायालयाने दिली आहे.