मुंबई - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांनी सरकारला रोखण्यासाठी संघर्षाचा इशारा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी प्रादेशिक पक्ष विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( Shiv Sena and NCP ) खच्चीकरण करणे, हाच अजेंडा भाजपा ( BJP ) राबवत आहे. मात्र मुंबई सारख्या महानगर पालिकेत शिवसेनेला रोखणे भाजपाला सध्यातरी कठीण असल्याचे बोलले जाते.
राज्यात हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसाचा हट्ट खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अंगलट आला आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही आक्रमक शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा संताप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडी खासकरून शिवसेनेविरोधात संघर्ष सुरू करू, असा इशारा दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षाच्या व्याख्येची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फिरकी घेतली. तर दुसरीकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपच्या हालचाली आहेत, असे आघाडीतील नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. मात्र राज्यात सत्तेत येण्यासाठी नव्हे तर मुंबई मनपामध्ये गेली २५ वर्षे सत्तेत पाय रोवलेल्या शिवसेनेला सुरुंग लावण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर यामुळेच आरोपांचा भडिमार भाजपकडून सुरू आहे. परंतु, मुंबईत शिवसेनेपुढे भाजपचा निभाव लागणे, सध्या तरी कठीण असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः मुंबई महापालिकेचा चाळीस ते पन्नास हजार कोटीचे बजेट आणि सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या ठेवी, या गोष्टींमुळे मुंबई महापालिका सगळ्यांचे लक्ष केंद्रित आहे. शिवसेनेकडे मुंबई महापालिकेची सत्ता वर्षानुवर्षे आहे. सन २०१७ मध्ये भाजपाचे ३१ वरून वाढून ८२ नगरसेवक झाले. भाजपाच्या आशा रुंदावल्या असून शिवसेनेसोबतच्या स्पर्धेमध्ये अगदी जवळपास आले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक कळीची ठरणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य मुंबईत येत आणि हनुमान चालीसा म्हणायची भाषा करते. त्याच्यावर कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊन राष्ट्रपती राजवट अशा चर्चा सुरू होते. परंतु, राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही, हे फडणवीसांना सुद्धा माहिती आहे. राष्ट्रपती राजवट लावली तरी १४५ आमदारांचे संख्या भाजपाकडे नाही. त्यामुळे जो काही संघर्ष महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने करायचा आहे. सरकारला खच्ची करत असताना शिवसेनेचे खच्चीकरण हाच अजेंडा भाजपाचा म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचा दिसतोय, असे मत राजकीय विश्लेषक आणि वरीष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई महापालिकेत गेली पंचवीस वर्षे भाजपा शिवसेनेसोबत सत्तेत होती. भ्रष्टाचार त्यावेळी झाला नव्हता का.? की सत्तेचा मलिदा चाखण्यात भाजपा मग्शुल होता. आज सत्तेत नाहीत, म्हणून भाजपाकडून आरोप सुरू आहेत. दुसरीकडे भोंग्यांच्या आडून सुरू असलेले हिंदुत्वाचे राजकारणही भाजपावर उलटले आहे. त्यामुळेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहिष्कार टाकल्याचे सांगत सर्वपक्षीय बैठकीला जाणे टाळले. भाजपाची दुटप्पी राजकारणाची चाल आता जागृत मतदारांच्या लक्षात आली आहे. मुंबईत त्याचे परिणाम दिसतील, असे वाटत नाही असे मत राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार श्रीरंग सुर्वे वर्तवतात.
प्रादेशिक पक्षांची शक्ती क्षीण होणे, हा सकारात्मक संदेश मानला पाहिजे. कारण प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय प्रश्नाशी काही घेणे देणे नसते. त्यांच्यासाठी राज्यातील विषय महत्त्वाचा असतो. अशावेळी प्रादेशिक पक्षांना बदनाम करणे हाच अजेंडा भाजपाकडून राबवला जातो आहे. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला टार्गेट केले जात आहे. तर दुसरीकडे प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कथित भ्रष्टाचारांचे आरोप करून प्रतिमा मलिन करण्यावर भाजपने भर दिल्याचे दिसते. मात्र भाजपाला महाराष्ट्रात हे ध्येय साध्य करणे अशक्य असल्याचे बोलले जाते.
हेही वाचा - Sanjay Raut on Kirit Somaiya : तो माथेफिरू हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून येतो आणि.. संजय राऊतांचा सोमैयांना टोला