मुंबई - यंदाची शिवजयंती १०० व्यक्तींच्या उपस्थितीत साजरी करण्यास गृह राज्य विभागाने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या आहेत. यापूर्वी १० जणांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्यास संमती दर्शवली होती. मात्र, सर्वच स्तरावरून सरकारवर टीका सुरू झाल्याने नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
येत्या शुक्रवारी १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीवर राज्य गृह विभागाने निर्बंध घातले होते. तशा संबंधीच्या मार्गदर्शक सूचना गुरुवारी जारी केल्या. गर्दी टाळणे, मास्क लावणे, रॅली न काढण्याबरोबरच केवळ १० व्यक्तीमध्ये शिवजयंती साजरी करण्याच्या सूचना केल्या होत्या. शिवजंयती साजरी करणाऱ्यांच्या आनंदावर यामुळे विरजण पडल्याने सरकारला टीकेचे लक्ष्य बनावे लागले. त्यानंतर सरकारने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिल्याचे म्हटले आहे.
अशा आहेत सूचना -
- अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन एकत्रितपणे शिवजंयती साजरी करतात. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळण्याचे आणि साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
- दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्याऐवजी केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी.
- कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी दिली आहे.
- आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण करावे.
- करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.