मुंबई - सिंधुदूर्ग येथील सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावर विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी एक- दोन नगरसेवक इकडून तिकडे गेले की, शिवसेनेला पंतप्रधान पद मिळाल्यासारखे वाटते, अशा शब्दात समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये जोरदार जुपंत आहे. त्यामुळे शिवसेना फडणवीस यांना काय, प्रतिउत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शिवसेनेवर तोंडसूख घेण्याची एकही संधी भाजप सोडताना दिसत नाही. सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उद्धाटन झाले. शहा यांनी यावेळी शिवसेनेला मुख्यमंत्री देण्याबाबत कोणताही शब्द दिला नव्हता. बंद खोलीत मी चर्चा करत नाही, जे करतो ते उघडपणे करतो, असे सांगत शिवसेनेवर सडकून टीका केली होती. तर दुसऱ्याच दिवशी भाजपचे सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी अमित शाह, नारायण राणे आणि भाजपच्या कार्यपध्दतीवर टीकास्त्र सोडले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा केली असता, नगरसेवक येणं- जाणं काही नवीन नाही. सध्या शिवसेनेची स्थिती अशी झालीय की, एक-दोन नगरसेवक इकडून तिकडे गेले तरी पंतप्रधान पद मिळाल्यासारखे वाटते. जे नगरसेवक गेले त्यांना भाजपकडून तिकीटच मिळणार नव्हते. त्यामुळे त्यांनी पक्षप्रवेश केला, यात काही नवे नसल्याचे फडणवीस म्हणाले.
हे सरकार शरजीलचे -
वादग्रस्त वक्तव्यं आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली शरजील इमामला अटक झाली आहे. राज्य सरकार त्याबाबत काहीही बोलत नाही. मात्र, कलाकारांच्या ट्विटची चौकशी करण्याचा निर्णय घेतला जातो. सरकारचे मानसिक संतुलन ठीक नाही. हे शरजीलचे सरकार आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.
सरकार कोणाला वाचवतेय-
भंडारा सार्वजनिक रुग्णालयाच्या आग दुर्घटनेची चौकशी सुरु आहे. चौकशीचा अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. चौकशी पूर्ण होण्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. अत्यंत हृदयद्रावक घटनेच्या चौकशीला विलंब होणे हा प्रकार गंभीर आहे. सरकारने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत. परंतु, सरकार कोणाला वाचविण्यासाठी प्रयत्न करतेय, असा सवाल फडणवीस यांनी परिषदेत उपस्थित केला.
मुंबई मनपा अर्थसंकल्पात आकड्यांचा खेळ -
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्पातील आकडे मोठे आहेत. खड्डे, पाणी, रस्ते, शिक्षण आदी विभागांची स्थिती सुधारण्यावर भर द्यायला हवा. परंतु, भ्रष्टाचारीवृत्तीमुळे अर्थसंकल्पातील आकड्यांचा मेळ लागत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.
लोकलचा सर्वसामान्यांना फटका -
सर्वसामान्यांना वेळेचे बंधन घालून लोकल सेवा सुरु झाली आहे. परंतु, सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. अत्यावश्यक कर्मचारी वेळेत पोहचावे हा उद्देश सरकारचा आहे. परंतु, मंत्रालयातील कर्मचारी अनेकदा ठिकाणावर मिळत नाहीत. सर्वसामान्यांचीच यामुळे गैरसोय होते. त्यामुळे पूर्ण वेळ लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु व्हावी.