मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबईकरांना होत असलेल्या खड्ड्यांचा विषय चव्हाट्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत नवे अभियान राबविण्याचे जाहीर केले आहे. यासाठी, 'मुंबई बन गई खड्डे का अड्डा' हे नवीन विशेष अभियान आजपासून सुरू केले जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
#KhaddeKaAdda #MumbaiPotholes या हॅशटॅग्सखाली हे अभियान राबवण्यात येणार असून, या अभियानात जनतेने सामील व्हावे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे. या अभियानात, 'मुंबई बन गई खड्डे का अड्डा' या नावाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खड्ड्यांचे फोटो काढून, सोशल मीडियावर महापालिकेला टॅग करणार आहेत आणि त्यातील किती खड्डे बुजवले, नाही बुजवले हे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस विचारणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेने मुंबईत फक्त ४०० ते ५०० खड्डे असल्याचा दावा केला होता. मात्र, मुंबईत २५ हजारच्या आसपास खड्डे आहेत असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
आजपासून हे अभियान सुरू होणार आहे. यामुळे, खड्ड्यांचे सोशल ऑडिट देखील होईल. जोपर्यंत मुंबईतील खड्डे बुजत नाहीत, तोपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू करत आहोत. यानंतरही जर खड्ड्यांवर कारवाई झाली नाही, तर वॉर्डनुसार आंदोलन करू असा इशाराही यावेळी नवाब मलिक यांनी दिला.