मुंबई - महाराष्ट्रात सध्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. पश्चिम रेल्वेवरील मुख्य स्थानक 'मुंबई सेंट्रल'चे नाव बदलले जाणार आहे. हे स्थानक आता 'नाना शंकरशेठ स्थानक' या नावाने ओळखले जाणार आहे. यासाठी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची आग्रही भूमिका होती. या नामांतराविषयी मुंबईकरांना काय वाटत हे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट
खासदार सावंत यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला होता. त्याला रेल्वे मंत्रालयाकडून आता हिरवा कंदीलही मिळाला आहे. त्यामुळे लवकरच या स्थानकावर आता नाना शंकरशेठ यांच्या नावाचा फलक पहायला मिळणार आहे. मात्र, काहींनी या नामांतराचे स्वागत केले. तर दुसरीकडे नामांतराने शहराचा विकास होणार आहे. जे गरजेचे आहे तिथे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत मुंबईकरांनी ईटीव्ही भारताशी बोलताना व्यक्त केले.
नाव बदलाचे स्वागत मात्र, विकासाच्या मुद्द्यावर लक्ष देण्याची गरज -
मुंबई सेंट्रलचे नाव नाना शंकरशेठ होणे ही चांगली बाब आहे. नाना थोर समाजसेवक होते. त्यांचे कार्य खूप मोठे आहे. आम्ही या गोष्टीचे स्वागत करतो मात्र हे करत असताना शहराचा आणि राज्याचा विकास होणे गरजेचे आहे. विविध ठिकाणाचा नामांतराचा मुद्दा सध्या खुप गाजत आहे. राज्यात सध्या कोरोना आणि बेरोजगारी लक्ष देणे अधिक गरजेचे आहे असे रोहन मिसाळ यांनी सांगितले.
नाव बदलून काय मिळतं, प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष द्या -
मुंबई सेंट्रल हे जगभरात गाजलेले नाव आहे. हे नाव बदलून नेमकं काय अपेक्षित आहे. या नाव बदलणे काय फरक पडणार आहे. एलफिस्टन रेल्वे स्थानकाचे नाव बदलले काय बदल झाला. महाराष्ट्रात एवढे प्रश्न प्रलंबित असताना नको त्या गोष्टीत लक्ष घालून काय साध्य करत आहेत हे त्यांचे त्यांनाच माहीत आहे. समाजाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे तिथे लोकप्रतिनिधीने लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे, असे पंकज शहा यांनी सांगितले.
ब्रिटिशांनी ठेवलेली नावे बदलण्यात लोकप्रतिनिधींचा पुढाकार चांगली बाब -
मुंबई सेंट्रल चे नाव नाना शंकर शेठ करण्यात येत आहे. ही खूप चांगली बाब आहे. ब्रिटिशांनी ठेवलेली नावे बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेत आहेत ही चांगली बाब आहे. मुंबईकर म्हणून आमचा याला पाठिंबा आहे नाना शंकर शेठ यांचे कार्य खूप मोठे होते, असे अमित शिंदे यांनी सांगितले.