मुंबई - नाशिकमधील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन दुर्घटना झालेल्या मुंबई महापालिकेकडून काळजी घेतली जात आहे. अशी घटना मुंबईत कुठे होऊ नये, म्हणून मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. यासंदर्भात सायन हॉस्पिटलच्या असिस्टंट इंजिनियर मनीषा जाधव यांनी ऑक्सीजन टँक रिफिलिंग संदर्भात विशेष काळजी पालिका प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे सांगितले.
सायन हॉस्पिटल हे मुंबई उपनगरांमधील मुख्य पालिका रुग्णालय आहे. या ठिकाणी धारावी, सायन कोळीवाडा, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या ठिकाणाहून असंख्य रुग्ण हे येत असतात. या कोरोनाच्या काळात सायन हॉस्पिटलची ऑक्सिजन वापरण्याची क्षमता वाढलेली आहे. पूर्वी सहा मेट्रिक टनापर्यंतचा वापर नऊ मेट्रिक टनाहून अधिक झाला आहे. ऑक्सिजन रिफिलिंग दिवसातून दोन वेळा होते.
हेही वाचा-नाशिकला 120 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज, फक्त 85 मेट्रिक टन उपलब्ध -जिल्हाधिकारी
अशी घेण्यात येते काळजी-
सायन हॉस्पिटलच्या असिस्टंट इंजिनियर मनीषा जाधव म्हणाल्या, की रिफिलिंग होत असताना पालिका हॉस्पिटलच्या आवारामध्ये गर्दी नसणार याची काळजी घेऊनच ऑक्सीजन रिफिलिंगची प्रक्रिया पूर्ण केली जाते. ऑक्सिजन पुरवण्याचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराचे कामगार आणि हॉस्पिटलमधील कामगार हे दोन्ही ऑक्सिजन टँकच्या येथे जाऊन रिफिलिंग करतात. रिफिलिंग करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेच पालन करत ऑक्सिजन रिफिलिंग हे केले जाते. ही प्रक्रिया जवळपास एक ते दीड तास चालू असते. या प्रक्रियेची काळजी घेतली जाते. त्या ऑक्सीजन प्लांटसमोर सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावलेले आहेत. त्याचे लाईव्ह फुटेज आम्हाला वेळोवेळी आमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी हॉस्पिटल प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. आज महानगरपालिकेने एक वेगळी एसओपी लागू केलेली आहे. त्याचे सुद्धा पालन आमच्या हॉस्पिटलकडून करण्यात येईल, असे मनीषा जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
हेही वाचा-बघा VIDEO: आईचा कोरोनाने मृत्यू, तरुणीने चौथ्या मजल्याहून मारली उडी, अखेर...
काय घडली होती नाशिकमध्ये घटना?
नाशिक महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर झाकिर हुसेन रुग्णालयात 13 केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक लावण्यात आला होता. हाच टँक बुधवारी लीक झाला. हा टँक लीक झाल्यानंतर अर्धा तास होऊनदेखील हॉस्पिटलमधील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागला. या घटनेचे गंभीर पडसाददेखील उमटलेले आहेत.
दरम्यान, कोरोनाचे रुग्ण वाढत असताना राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.