मुंबई - कोरोना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि एसटीचे महसूल वाढवण्याकरिता एसटी महामंडळाने मालवाहतूक क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर एसटीच्या मालवाहतुकीला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एसटीच्या मालवाहतूक विभागाने आतापर्यंत 64 हजार फेऱ्यातून पाच लाख मेट्रिक टनाची माल वाहतूक केली आहे. त्यामधून एसटी महामंडळाला 37 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
एसटीचे १ हजार 150 मालवाहतूक ट्रक-
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरातील एसटी महामंडळाची बस वाहतूक बंद करण्यात आलेली होती. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला बसला होता. परिणामी एसटी महामंडळाचा झालेला तोटा भरून काढण्यासाठी आणि महामंडळाचे महसूल वाढविण्याकरिता 1 मे 2020 रोजी एसटीने मालवाहतूकीच्या क्षेत्रात पदार्पण केले. प्रवासी गाड्यांमध्ये काही अंशतः बदल करून माल वाहतुकीसाठी वाहन तयार करण्यात आले होते. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात राज्यभरतात 1 हजार 150 एसटीचे मालवाहतूक ट्रक आहेत.
शेतकरी- व्यापाऱ्यांकडून मालवाहतूक उत्तम प्रतिसाद....
माफक दर सुरक्षित व नियमित सेवेमुळे एसटीच्या मालवाहतूक दिवसेंदिवस राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे एसटीच्या मालवाहतूकीला पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जळगांव, गडचिरोली, रत्नागिरी, कोल्हापूर औरंगाबाद नागपूर आणि अमरावती जिल्हातून शेतकऱ्यांच्या आणि छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत 1 हजार 150 एसटीच्या मालवाहतूक ट्रकच्या 64 हजार फेऱ्यातून पाच लाख मेट्रिक टनाची मालवाहतूक करण्यात आलेली आहे.
काय आहे मालवाहतुकीचे दर-
इंधन दरवाढीमुळे एसटीने मालवाहतुकीचे गेल्या वर्षी मालवाहतुकीचे दर वाढलेले होते. त्यामुळे सध्या एकेरी जाणाऱ्या मालवाहतुकीचा दर प्रति किमी 38 रुपये करण्यात आलेला आहे. तसेच प्रति दिवस मालवाहतुकीसाठी तीन हजार 500 रुपये भाडे एसटी महामंडळाकडून निश्चित करण्यात आले आहे. आतासुद्धा इंधन दरवाढ कायम असल्याने पुन्हा एसटीच्या मालवाहतुकीचे भाडे वाढणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र एसटी महामंडळ कडून कसलीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आलेली आहे.