मुंबई - भाजपकडून करण्यात आलेल्या महिला उद्योजकांच्या जाहिरातीची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा पोलखोल केली. औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील रेखा वाहुटळे या महिलेला उद्योजक महिला म्हणून तिची जाहिरात केली, परंतु त्यासाठी तिला कोणतीही मदत केली नाही. तिचा वापर मात्र भाजपने जाहिरातीसाठी केल्याचा धक्कादायक खुलासा खुद्द या उद्योजक महिलेने आज मनसेच्या पत्रकार परिषदेत केला.
भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी वांद्रे येथे सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात खुलासा करण्यासाठी एक पोल-खोल सभा घेतली होती. त्यात अनेक व्हिडिओ दाखवत राज ठाकरे हे खोटे बोलतात, असा आरोप केला होता. त्याचा समाचार घेत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राजगड येथे पत्रकार परिषद घेऊन शेलार यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.
गाढवाने घोड्याचे कितीही कातडे ओढले, तरी तो घोडा होऊ शकत नाही, अशा शब्दात शेलार यांच्यावर त्यांनी टीका केली. खोदा पहाड निकला चुहा असे शेलार यांचे झाले. त्यांनी 32 मुद्द्यांची पोलखोल करू असे, सांगितले होते. परंतु ते केले नाही, शेलार यांनी आमच्याकडे येऊन थोडीशी ट्रेनिंग घेतली असती तर त्यांना अनेक मुद्दे प्रभावीपणे मांडता आले असते, असा टोलाही देशपांडे यांनी लगावला.
भाजपकडून करण्यात आलेल्या खऱ्या दाव्याची पुन्हा एकदा देशपांडे यांनी फोन कॉल करत शेलार हे कसे खोटारडे आहेत, याची माहितीच पत्रकार परिषदेत दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील डोंगरगाव येथील महिला उद्योजिका रेखा वाहूटळे यांनाच पत्रकार परिषदेमध्ये आणून भाजपच्या खोट्या जाहिरातीची त्यांननी चिरफाड केली. वाहुटळे यांच्या नावाने भाजप सरकारने मागील वर्षभरापूर्वी महिला उद्योजिका म्हणून त्यांची मोठी जाहिरात केली होती. त्याही विविध योजनेच्या लाभार्थी असल्याचे सांगितले होते. त्याविषयी वाहुटळे यांनी मला सरकारने कुठलाही लाभ दिला नाही. केवळ मी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सरकारकडून घेतले परंतु माझ्या उद्योग जगाचा सरकारने मला न सांगता माझ्या फोटोचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.
या सरकारच्या पूर्वीच माझा मसाल्याचा उद्योग सुरू होता. परंतु सरकारचे प्रतिनिधी आल्यानंतर त्यांनी माझा वापर केवळ जाहिरातीसाठी केला. मला कसलाही लाभ त्यांनी दिला नाही, असा आरोपही वाहुटळे यांनी केला. अशा प्रकारच्या खोटारड्या सरकारकडून राज्यात महिला उद्योजग कशा उभ्या राहतील, असा सवालही त्यांनी केला. मी बँकेत दहा लाखांचे कर्ज घ्यायला गेले, तर बँकेने कर्ज दिले नाही. तारण मागितले. तीन वर्षांचे आयटी रिटर्न मागितले. त्यामुळे मला कुठले कर्ज मिळाले नाही. मला सरकारने प्रशिक्षण दिले पण कोणताच लाभ दिला नाही. तरीही सरकारने माझ्या नावाने लाभार्थीं असल्याची जाहिरात केली, असेही त्यांनी सांगितले.