मुंबई - औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र काही वेळातच हा निर्णय रद्द करण्यात आला होता. या निर्णयानंतर या लॉकडाऊनला विरोध करणारे इम्तियाज जलील यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी करून एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे.
असे 'व्हायरस' वेळीच ठेचायला हवेत -
एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमध्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढतेय, परिस्थिती गंभीर आहे असं असताना असा जल्लोष करताना, नाचताना शरम वाटायला पाहिजे. हा तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे 'व्हायरस' वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत केली आहे.
