मुंबई - इंपेरिकल डाटावरून विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये भाजप आमदार गेले असता, यावेळी भास्कर जाधव आणि भाजपा आमदार संजय कुठे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच भाजपाला गुंडगिरी करून हे कामकाज चालवायचे आहे. या सर्वावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
'राज्याच्या इतिहासात असा प्रकार झाला नाही' -
विधानसभेमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत इंपेरीकल डाटा मिळवण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता. पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी प्रस्ताव मताशी टाकला. मात्र, त्यानंतर विधानसभा 10 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आली. यावेळी भाजपा आमदार भास्कर जाधव यांच्याकडे गेले असता, त्यांच्यात धक्काबुक्की झाली, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच राज्याच्या इतिहासात असा प्रकार कधीही झाला नसल्याचेही ते म्हणाले.
'कुठलीही धक्काबुक्की झाली नाही' -
या संदर्भात बोलताना विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये असा कोणाताही प्रकार झाला नसल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच काही लोक सभागृहाचे कामकाज होऊ नये म्हणून सैराचार करत असून आम्ही या लोकांचा बुरखा फाडू, असेही ते म्हणाले.
भाजपा नेत्यांच्या मनात ओबीसींबाबत द्वेश -
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपावर जोरदार टीका केली. भाजपानेते ओबीसी आरक्षाबाबात खोटी माहिती देत समाजाची दिशाभूल करत होते. मात्र, छगन भुजबळ यांनी याचे समोर आणले. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा तोल सुटला. त्यानंतर भाजपा नेत्यांनी अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की केली. यावरून भाजपा नेत्यांच्या मनात ओबीसीबाबत किती द्वेश आहे, हे दिसते असेही ते म्हणाले.
हेही वाचा - maharashtra assembly session : आमदार संजय कुटे आणि भास्कर जाधव यांच्यात धक्काबुक्की