मुंबई - सर्वत्र मुंबईत 'ब्लॅकआऊट'ची घटना ताजी असताना आज मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधील वीज पुरवठा तब्बल २० मिनिटांसाठी खंडित झाला. मंत्री आणि अधिकारी असलेल्या इमारतीतच अचानक बत्ती गुल झाल्याने अनेक विभागांची कामे खोळंबली. दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे वीज खंडीत झाल्याची माहिती मंत्रालयातील वीज पुरवठा विभागाने दिली.
मंत्रालय हे महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख वास्तू आहे. संपूर्ण राज्याचा गाडा येथून हाकला जातो. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. येथे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. अचानक वीज गेल्याने सर्वच दालनात अंधार पसरला. कार्यालयीन कामे यामुळे खोळंबली होती. अखेर २० मिनिटांनी वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
मेट्रोच्या कामामुळे वीज पुरवठा खंडीत
मुंबईत मेट्रोच्या कामाचे जाळे विणले जात आहे. मंत्रालयासमोरही मेट्रोची कामे सुरू आहेत. हे काम सुरू असताना मंत्रालयाला वीज पुरवठा करणारी बेस्टची वीज पुरवठावाहिनी ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास तुटली. मंत्रालयाच्या कामकाजावर याचा परिणाम झाला. वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती बेस्टला दिल्यानंतर १२ वाजून १० मिनिटांनी पुरवठा पूर्ववत करण्यात आला असल्याची माहिती वीज पुरवठा विभागाने दिली.
मुंबईवर सायबर हल्ला झाल्याची भीती
मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत बत्तीगुल झाली होती. सरकारने याची चौकशी करण्यासाठी तांत्रिक समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात मुंबईवर सायबर हल्ला झाल्याचे म्हटले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत विधानसभेत माहिती दिली होती.