मुंबई : राज्यातील तापमानात घट होणार आहे. त्यामुळे उकाड्याने परेशान झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमानात हा बदल होणार असला तरी, विदर्भातील तापमान मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तविला आहे.
..तरच मान्सूनला मिळणार बळकटी : आजपासून (दि. 8) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषतः सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी पूर्व मोसमी पावसाचा उपयोग होणार असल्याचा अंदाज आहे. मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटकात थांबला आहे. त्याठिकाणी कारवार, चिकमंगलळूर, बंगळूर, धर्मापुरी दरम्यान स्थिर झाला आहे. कर्नाटकात रेंगाळलेल्या मान्सूनला बळकटी मिळाल्यास तो महाराष्ट्रात पुढील वाटचाल करेल.
यावर्षी २९ मेलाच मान्सून केरळात : यावर्षी मान्सून 16 मे रोजी अंदमानात दाखल झाल्यानंतर 29 मे रोजी तो केरळात दाखल झाला. कर्नाटकपर्यंत मान्सूनची वाटचाल योग्य वेळेतच सुरु होती. मात्र अचानक मान्सूनचा प्रवाह कुमकुवत झाल्याने तो कर्नाटकातच थांबला आहे. दुसर्या बाजूने मात्र संपूर्ण इशान्य भारत मान्सूनने व्यापला गेला आहे. सिक्किम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. मध्य महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाला सुरूवात झाली असून, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात बर्याच ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील वाटचालीला पोषक स्थिती निर्माण झाली नसल्याने मान्सूनची वाटचाल थांबली आहे.