मुंबई - शहरी भागाचा अपवाद वगळता राज्यातील लाखो पालकांकडे चांगले मोबाईल नाहीत, त्यामुळे इंटनेट आणि इतर बाबी दूरच राहतात. अशा वेळी राज्यात ऑनलाईन शिक्षण कसे सुरू करणार, असे अनेक प्रश्न आमदारांनी उपस्थित केल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायवाड निरुत्तर झाल्याचे चित्र आज एका बैठकीत समोर आले.
राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्राला सुरू करताना कोणत्या अडचणी येतील यासाठी आज शिक्षणमंत्री गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या काही आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या द्वारे बैठक घेतली. त्यात अनेकांनी ऑनलाईन शिक्षणावर प्रश्न उपस्थित करून त्यासाठी राज्यातील परिस्थितीची जाणीव करून दिली. शाळा सुरू करण्यासाठी राज्यात येणाऱ्या अनेक अडचणी आणि त्यावरील अनेक उपायांवर आमदारांनी अनेक चांगल्या सूचना केल्या. तर या सूचनांचे शिक्षणमंत्र्यांनी स्वागत केले.
![Maharashtra Education Minister Varsha Gayakwad still not clear about how online education will work in state](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-edu-mini-mla-mitting-7201153_08062020224121_0806f_1591636281_655.jpg)
उद्या काही दिवस मोबाईलवरच शिक्षण देण्याची वेळ आली तर मुले किती वेळ मोबाईलवर बसतील, त्यातून त्यांच्या इतर काही अडचणी निर्माण होणार नाहीत काय, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आमदारांनी उपस्थित केले आणि त्यावर पर्यायही सांगितले.
राज्यात ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा आणि त्यांचे वास्तव हे खूप वेगळे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळांमध्ये नीट शौचालये नसतात, त्यावेळी त्यांची काळजी कशी घेणार असा सवाल शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला. यासाठी अगोदर सोयी-सुविधांसाठी एखादा सर्व्हे करावा अशी सूचना त्यांनी केली. तर दुसरीकडे आमदार सुनील प्रभू यांनी शाळा कधी सुरू करायच्या याची एकदा तारीख जाहीर करावी, यामुळे पालकांची मानसिकता तयार होईल अशी सूचना केली. तसेच यादरम्यान वाया गेलेले दिवस रविवार आणि सार्वजनिक सुट्टया कमी करून भरून काढता येतील तसेच शाळा भरताना किती तासांची असावी यासाठीचा एक अहवालही आमदार प्रभू यांनी दिली.
यापुढे शाळांमध्ये मास्क, हात धुण्याची सोय, सॅनिटायझर, ताप मापक आणि प्राणवायू मापक यंत्राची सुविधा मात्र आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी कोरोनाची समाजातील भिती घालविण्यासाठी शाळा सुरू होणे आवश्यक असून, त्यासाठी तारीख लगेच जाहीर करावी अशी सूचनाही आमदार प्रभू यांनी केली. यासोबत इतर आमदारांनीही ऑनलाईन शाळेतील अडचणींवर भर देत ते कसे सोडवणार असा विषय पुढे मांडला. तर येत्या काळात शाळा सुरू करताना, आठवी ते दहावीपर्यंचे वर्ग सुरू करण्यासाठी लवकर निर्णय घेऊ असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा : यवतमाळातील 'मांझी'ने २ वर्षं मेहनत करून खोदली ३० फूट खोल विहिर