मुंबई - वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट दिसून आला. मात्र बाहेर गावी जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडू नये, म्हणून रेल्वेकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
रेल्वेकडून २५ विशेष गाड्या
मुंबईसह राज्यातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुन्हा टाळेबंदी होण्याच्या भीतीने, मुंबईत रोजगारासाठी आलेल्या मजुरांनी पुन्हा एकदा परतीची वाट धरली आहे. रोजगार नाही आणि कामाचे पैसेही न मिळाल्याने त्रस्त असलेले मजूर उत्तरप्रदेश बिहारमध्ये आपल्या गावी जाणे पसंत करत आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईसह उपनगरातून हजारो परप्रांतीय मजूर आपल्या गावी जात आहेत. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून रेल्वेकडून 25 विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मजुरांना दिलासा
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून, दररोज ११३ लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येतात. मात्र, दरवर्षी उन्हाळाचा हंगामात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, विशेष गाड्या चालविण्यात येत असतात. सध्या कोरोनामुळे प्रवाशांची गर्दी आणि कोविडचा संसर्ग लक्षात घेता अतिरिक्त गाड्या चालविण्यात येत आहेत, सध्या मध्य रेल्वेकडून एकूण ११३ लांब पल्ल्यांच्या गाड्या व्यतिरिक्त एकूण 25 विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे गावी परत जाणाऱ्या मजुरांना दिलासा मिळाला आहे.
दररोज दीड लाख प्रवासी
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांवरून दररोज १३८ मेल-एक्स्प्रेस गाड्या ये-जा करतात. त्यातूत दीड लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड सारख्या राज्यासाठी २५ विशेष मेल- एक्स्प्रेस गाड्या धावत असून, दररोज ३० ते ३२ हजारांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. तसेच अनेक गाड्यातील पुढील काही दिवसांची आरक्षीत आसनांची क्षमता संपली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
शनिवारी श्रमिक ट्रेन चालविण्यात येणार असल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे एलटीटी स्थानकात प्रवाशांनी विना तिकिट गावी जाण्यासाठी गर्दी केली. अशा कोणत्याही श्रमिक विशेष गाड्या' चालविल्या जात नाहीत. रेल्वे फक्त उन्हाळी विशेष गाड्या आणि नियमित विशेष गाड्या चालवत आहे. लोकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - राज्यात 63 हजार 294 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 349 मृत्यू