मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील नागरिक त्यांच्या घरी, त्यांच्या राज्यात परतू इच्छित होते. त्यांना सुविधा मिळावी म्हणून रेल्वेप्रमाणेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही राज्याच्या चहुबाजूच्या सीमेपर्यंत धावल्या. एकूण 44 हजार 106 बस फेऱ्यांमधून 5 लाख 37 हजार 593 स्थलांतरित नागरिकांना रेल्वेस्टेशनपर्यंत तसेच त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात आले. 31 मेपर्यंतच्या या अभियानात एसटी बसेसने तब्बल 152.42 लाख किमीचा प्रवास केला.
परराज्यातील नागरिकांना सुखरुप त्यांच्या राज्यात परतता यावे, यासाठी महामंडळाने बसेस उपलब्ध करून दिल्या. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवले आणि त्यासाठी राज्य शासनाने 104.89 कोटी रुपयांचा खर्च केला. औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती अशा सहा भागांतून नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत तसेच रेल्वेस्टेशनपर्यंत जाण्यासाठी एसटी महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून दिली. दोन लाखांहून अधिक लोकांना रेल्वेस्टेशनवर पोहोचवले. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल तसेच आसाम, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब, तामिळनाडू अशा विविध राज्यांत रेल्वेने जाणाऱ्या मजुरांना रेल्वेस्टेशनपर्यंत सोडण्याचे काम एसटी महामंडळाच्या बसेसने केले. 2 लाख 28 हजार 100 नागरिकांनी बसच्या या सुविधेचा लाभ घेतला.
तीन लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडले. तर, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांच्या सीमेपर्यंत धावून एसटीने या नागरिकांना त्यांच्या राज्याच्या जवळ नेऊन पोहोचवले. या सुविधेचा 3 लाख 09 हजार 493 नागरिकांनी लाभ घेतला. राज्यभरातून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.