मुंबई - कोरोनामध्ये मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी ( Aid For Corona Death Patient Relative ) आयोजित जनसुनावणीत प्राप्त ३२८ अर्जांपैकी २७३ अर्ज ( Application For Corona Death Patient Relative ) मंजूर झाले असून या अर्जांचा राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) यांनी म्हटले आहे. मुंबईकरीता ३५ हजार १३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी २१ हजार ४३६ अर्ज मंजूर केले आहेत. मंजूर झालेल्या अर्जांपैकी २२१६ नागरिकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सहाय्य मिळालेले आहेत.
तत्काळ दिलासा मिळावा यासाठी जनसुनावणी -
कोरोनामध्ये मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना अद्यापपर्यंत आर्थिक मदत न मिळालेल्या नागरिकांची जनसुनावणी महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांसमवेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोमवारी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात पार पडली. त्यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, कोविड -१९ मध्ये मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सानुग्रह सहाय्य मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात आल्यानंतर तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून नागरिकांना तत्काळ दिलासा मिळावा, यासाठी जनसुनावणी ठेवण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामध्ये मुंबईकरांची फरफट होऊ नये, त्यांना एकाच छताखाली त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे, या उद्देशाने ही जनसुनावणी ठेवण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले. यापुढील काळात नामंजूर अर्जांचा विभाग स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
३५ हजार १३८ अर्ज -
कोविडने मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह सहाय्य शासनातर्फे देण्यात येते. शासनाने तयार केलेल्या पोर्टलमध्ये मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकांना ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. आतापर्यंत मुंबईकरीता ३५ हजार १३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी २१ हजार ४३६ अर्ज मंजूर केले आहेत. मंजूर झालेल्या अर्जांपैकी २२१६ नागरिकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सहाय्य मिळालेले आहे. एकूण अर्जापैकी १२ हजार ८७१ अर्ज नामंजूर झाले आहेत. त्यापैकी ०५ हजार ०३ नागरिकांनी तक्रार निवारण समितीकडे अर्ज केले आहेत. अश्या व्यक्तींची तक्रार निवारण समितीच्या बैठकीत त्यांची कागदपत्रे तपासून पुढील मंजूर किंवा नामंजूरची प्रक्रिया केली जाते. आज पार पडलेल्या तक्रार निवारण समितीच्या बैठकीत एकूण ३२८ नागरिकांनी तक्रार निवारण समितीच्या बैठकीत सहभाग घेतला. त्यापैकी २७३ अर्ज मंजूर झाले. ३६ नागरिकांचा मृत्यू मुंबई बाहेर झाला असल्यामुळे ते नामंजूर करण्यात आले. १९ नागरिकांचे कागदपत्र नसल्यामुळे पुढील बैठकीत पुन्हा कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा - Mask Free Maharashtra : महाराष्ट्र मास्कमुक्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण