मुंबई - परिवहन विभागाकडून राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियान सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, जळगावमध्ये एक मोठा अपघात झाला. या अपघातात 15 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा माल वाहतूक वाहनांमधून होणाऱ्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चौकशीनंतर कारवाई केली जाईल -
जळगाव दुर्घटनेतील अपघातग्रस्त वाहनाच्या नोंदणीनुसार ते रावेर येथील इस्लामपाडामधील शेख फय्याज यांच्या नावावर आहे. संबंधित वाहनाची फिटनेस तपासणीही झाली होती. मोठ्या संख्येने गरीब मजूर या माल वाहतूक वाहनामधून प्रवास करत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. मात्र, नेमके काय आणि कसे घडले, याबाबत स्थानिक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सोमवारी दिली आहे.
1 हजार 233 चालकांचे परवाने निलंबित -
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार माल वाहतूक वाहनांमध्ये मालाची चढ-उतार करण्यासाठी फक्त तीनच व्यक्तींना प्रवासाची परवानगी असते. 2020 साली 1 हजार 682 माल वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात पोलिसांनी प्रवासी वाहतूक केल्याबाबत कारवाई केली होती. त्यातील 1 हजार 380 वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव पोलिसांनी परिवहन विभागाला पाठवले आहेत. आत्तापर्यंत 1 हजार 233 चालकांचे परवाने निलंबित झाले असून 188 चालकांच्या परवान्यांवर निलंबनाची कारवाई सुरू असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले.
हेही वाचा - चंद्रकांत दादा हा कसला पुरुषार्थ ? शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जयंत पाटलांचा घणाघात