पुणे - शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांता प्रकल्प गुजरातला घेऊन जायला महाराष्ट्र काय पाकिस्तान होता काय? असा प्रश्न भाजपला विचारला आहे. त्यावर आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करतात याचे मला आश्चर्य वाटते. एकदा कंगना राणावत असे काही बोलल्या होत्या. तेव्हा केवढा गोंधळ झाला होता. (Devendra Fadnavis) आता आदित्य ठाकरे तीच भाषा बोलणार असतील तर मला आश्चर्य वाटत आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. ते भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२व्या भारतीय छत्र संसदेच्या आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
केंद्र सरकारच्या माध्यमातून आज आठ चित्ते भारतात आणले. त्यावर काँग्रेसने टीका केली. त्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, काँग्रेस आपली जागा शोधत आहे. कारण, ते जनतेत नाहीत आणि संसदेतही नाहीत. (Aditya Thackeray Vs Devendra Fadnavis) काँग्रेसचे अस्तित्व कमीकमी होत आहे. त्यामुळे त्यांनी एकच धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे, ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणे. मला असे वाटते की देशातील लोकांनी चित्त्यांचे स्वागत केले आहे. मात्र, काँग्रेसमध्ये केवळ नकारात्मकता भरलेली आहे. असही यावेळी फडणवीस म्हणाले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका करत पंतप्रधान हे ओबीसी नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, की नाना पटोले हे दिवसभर अशा काही गोष्टी बोलत असतात. त्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात. त्यामुळे तुम्ही देखील गांभीर्याने घेऊ नका. नाना पटोलेंना असे झटके येत असतात. त्यामुळे ते असे काही काही बोलत असतात. असही यावेळी फडणवीस म्हणाले आहेत.