मुंबई - मुंबईमध्ये सतत पाऊस पडल्यास सर्वात आधी दादर हिंदमाता ( Hindmata ), माटुंगा आणि गांधी मार्केट ( Gandhi Market area ) येथील किंग सर्कल परिसर जलमय होतो. यावर पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे यंदा या दोन्ही परिसरात जास्त वेळ पाणी साचून राहिलेले नाही. यामुळे येथील स्थानिक दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पालिकेने केलेल्या कामांमुळे यंदा पाणी साचण्याचा त्रास झाला नाही अशी माहिती येथील दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी दिली.
पालिकेचे कौतुक - मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात कमी दिवसात जास्त पाऊस पडतो. दादर हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन, मिलन सब वे आदी ठिकाणी पाणी साचते. यामुळे वाहतूक ठप्प होऊन मुंबई थांबते. यासाठी पालिकेकडून गेले काही वर्षे ‘ब्रिमस्टोवेड-दोन’ योजनेनुसार उपायोजना केल्या जात आहेत. हिंदमाता येथे उभारण्यात आलेल्या भूमिगत पाणी साठवण टाक्या, किंग सर्कल येथे उभारण्यात आलेली पाणी वाहून नेणारी प्रणाली याची पाहणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी केली. यावेळी स्थानिक दुकानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी पालिकेने केलेल्या कामामुळे हे शक्य झाल्याचे सांगत पालिकेच्या कामाचे कौतुकही केले आहे.
आमचे नुकसान टळले - गांधी मार्केट गेले ४५ वर्षे पावसात पूरमय होत असल्याने आम्हाला नेहमीच प्रचंड त्रास झाला. दरवर्षी पाण्यामुळे प्रचंड नुकसान होत होते. पावसाळ्यात दहा ते बारा दिवस साचलेल्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. पण यंदा पालिकेने मोठ्या क्षमतेचे सहा पंप बसविले असून त्यांची क्षमता ३ लाख लीटर प्रती मिनिट पाणी उपसण्याची असल्याने तिथे यावेळेस नेहमीप्रमाणे पाणी साचले नाही. पहिल्यांदा आमच्या दुकानांमध्ये पाणी घुसून नुकसान झालेले नाही. असे स्थानिक दुकानदार हरिओम शुक्ला यांनी सांगितले. तर हिंदमाता येथे साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. पालिकेच्या उपाय योजनांनी बराच दिलासा मिळाला आहे. यंदा पावसात पाणी साचून नुकसान झाले नसल्याचे स्थानिक दुकानदार रागीन पटेल यांनी सांगितले.
हिंदमाता येथे केलेल्या उपाययोजना - पालिकेने हिंदमाता येथे उड्डाणपुलाखाली उदंचन व्यवस्था कार्यान्वित केली जात आहे. सेंट झेवियर्स मैदानाखाली १.०५ कोटी लीटर आणि प्रमोद महाजन मैदान येथे १.६२ कोटी लीटर क्षमतेच्या साठवण टाक्या बसविल्या जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे काम २०२१ मध्ये पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यातील सेंट झेवियर्स मैदानाखालील १.८१ कोटी लीटर क्षमतेच्या साठवण टाकीचे काम पूर्ण होत आहे. या विस्तारित टाकीचा उपयोग यंदाच्या पावसाळ्यात होणार आहे. प्रमोद महाजन उद्यानामध्ये दुसऱ्या टप्प्यातील साठवण टाकीची क्षमता १.९९ कोटी लीटर असून त्याचा वापर २०२३ मध्ये प्रत्यक्षात येणार आहे. हिंदमाता उड्डाणपुलाखाली उदंचन व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे जोरदार पावसावेळी पंप हे टाटा मिल, मध्य-पश्चिम रेल्वे रुळाखालून टाकण्यात आलेल्या वाहिनीद्वारे प्रमोद महाजन उद्यानातील साठवण टाकीपर्यंत नेले जाईल. या टाक्यात साठवलेले पाणी समुद्रातील भरती गेल्यावर समुद्रात सोडले जाईल. अशीच उपायोजना मिलन सब वे जवळ केली जाईल अशी माहिती पी वेलरासू यांनी दिली.
गांधी मार्केट येथे केलेल्या उपायोजना - गांधी मार्केट येथे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अभियंत्यांनी पर्जन्य जल वाहिनीचे जाळे, पाणी उपसण्याची क्षमता, पाणलोट क्षेत्र, भरती-ओहोटीच्या वेळी पाण्याची पातळी आदींचा अभ्यास करुन लघु उदंचन व्यवस्था उभारली आहे. चेंबर बनवून १,२०० मिमी व्यासाची वाहिनी टाकली आहे. रस्त्यावर साचणारे पाणी चेंबरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पर्जन्य जलवाहिनीत सोडले जाते. भारतनगर, अवंती अपार्टमेंट, षण्मुखानंद रेल्वे कल्व्हर्ट येथे प्रवेशद्वार, छोटे उदंचन संच बसविले गेले आहेत. याच प्रकारची उपाययोजना हिंदमाता येथेही केली जाणार असल्याचे वेलरासू यांनी सांगितले.
हेही वाचा - Uddhav Thackeray : शिवसैनिकावर हल्ला, उद्धव ठाकरे संतापले; म्हणाले, 'जीवाशी येत असेल तर खपवून...'