मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीमुळे राजकारण तापायला सुरुवात झाली असतानाच, दुसरीकडे सुर्यदेवही मुंबईवर कोपला आहे. सध्या मुंबईचा पारा ४० अंशावर पोहोचला असून गेल्या २ दिवसांपासून मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सोमवारी मुंबईतील तापमानाने २०११ मधील विक्रम मोडीत काढला. मार्चच्या अखेरलाच पारा ४० वर पोहोचल्याने पुढील २ महिन्यात काय होणार असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.
ऋृतुमानात बदल होत असल्याने पश्चिमेकडून वाहणारे वारे उशिरा वाहत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम तापमानावर झाला असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. मुंबईत रात्रीच्या तापमानात काहीशी वाढ झाली आहे. सांताक्रूझमध्ये २१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या दोन दिवसात मुंबईचे कमाल तापमान ४२ अंशापर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.