मुंबई: महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातील 581 ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रीया रवीवार आणि सोमवारी पार पडली, रवीवारी उत्साहाने मतदान करत गावकऱ्यांनी गावगाडा चालवणाऱ्या कारभाऱ्यांना निवडुन दिले. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. स्थानिक पातळीवर पॅनल तयार करुन लोक सदस्यपदासाठी लढतात पण निकाला नंतर कोणती ग्राम पंचायत कोणाच्या ताब्यात आली या वरुन दावे प्रतीदावे केले जातात तसाच प्रकार सध्या पहायला मिळत आहे. सत्ताधारी भाजप व एकनाथ शिंदे गट तसेच उध्दव यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने विजयाचा दावा केला आहे.
आमच्या युतीवर शिक्कामोर्तब : महाराराष्ट्रात 16 जिल्ह्यातील 581 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले त्याचे निकाल सोमवारी जाहीर झाले यात सगळ्यांनीच विजयाचा दावा केला आहे. भाजपने 274 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला तर शिवसेनेच्या शिंदे गटाने इतर 41 जिंकल्याचे म्हणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने अनुक्रमे 62, 37 आणि 12 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने आमच्या शिवसेना आणि भाजप युतीवर शिक्कामोर्तब केले आहे.
आगामी निवडणुकीतही एकत्र लढणार : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर बाहेर पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्याच नावाने वेगळा गट तयार केला त्यांनी हा विजय हा जनतेने आमच्या युतीला दिलेला जनादेश असल्याचे सांगत दोन्ही पक्षांमधील युती जनतेने स्वीकारल्याचा दावा केला आहे. आम्ही फक्त शिंदे गटाचे नाही तर आम्हीच खरी शिवसेना आहोत हे देखील स्पष्ट आहे त्यामुळे लोकांनी आमची युती स्वीकारली आहे त्यामुळे आम्ही 300 हून अधिक ग्राम पंचायती जिंकल्याचा दावा करताना त्यांनी आगामी निवडणुकीतही आम्ही एकत्र लढू असे स्पष्ट केले.
राष्ट्रवादीने सगळे दावे फेटाळले : दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि शिंदे गटाने केलेले दावे फेटाळून लावत महाविकास आघाडीचाच या निवडणुकीत विजय झाल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पक्षाचे कोणतेही चिन्ह दिले नसल्याने प्रत्येकजण विजयाचा दावा करू शकतो. भाजप-शिंदे गटाच्या दाव्यात तथ्य नाही, उलट खरी वस्तुस्थिती अशी आहे की, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटावर स्पष्ट बहुमत मिळवून विजय मिळवल्याचे त्यांनी म्हणले आहे.