मुंबई - अमरावती शहरातील राजापेठ येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीबाबत वाद सुरू आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावर ठाम आहेत. मात्र, शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी नियमावली आखून दिलेली आहे. पुतळा उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. नियमावलीचे पालन करून पुतळा उभारला गेला पाहिजे. महापुरुषांच्या पुतळ्यांची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. मात्र, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून काही लोक जाणून बुजून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil comment on Rajapeth Shivaji Maharaj statue ) यांनी सांगितले. आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे आवाहन शिवप्रेमींना केले.
हेही वाचा - VIDEO : ट्रकची स्कूटरला धडक; ११ वर्षाच्या मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी
नियमावलीनुसार शिवजयंती साजरी करा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सर्वांच्याच मनात प्रेम आणि आदर आहे. मात्र, अद्याप कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. कोरोनाची महामारी कोणताही जात, धर्म पहात नाही. तसेच, कोणत्याही धर्माला पाहून नियमावली तयार केलेली नाही. त्यामुळे, दिलेल्या नियमावलीचे पालन करूनच सर्वांनी शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जनतेला केले आहे.
एक पक्ष सोडून इतर पक्षांच्या नेत्यांवर धाडी
मुंबईत सुरू असलेल्या ईडीच्या धाडसत्राबाबत गृहमंत्री म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणेचा कशाप्रकारे वापर केला जातो, हे कोणापासूनही लपून राहिलेले नाही. एक पक्ष सोडून इतर सर्व पक्षांच्या नेत्यांच्या घरांवर धाडी टाकल्या जात आहेत, अशी टीकाही गृहमंत्र्यांनी केली आहे.
कोणाच्याही घरावर आंदोलन करू नये
कोणत्याही राजकीय पक्षाने कोणाच्याही घरावर आंदोलन करू नये, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केल. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगायला हवा, असा सल्लाही यावेळी गृहमंत्र्यांनी दिला. तसेच, मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे ते यावेळी म्हणाले.
संजय राऊत काय म्हणणार? हे दुपारनंतर स्पष्ट होईल
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगत आज शिवसेना खासदार संजय राऊत चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारच्या या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांना काय म्हणायचे आहे, ते स्पष्ट होईल. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व बाबी समोर येतील, असेही यावेळी गृहमंत्री म्हणाले.
हेही वाचा - Kirit Somaiya : सात दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही तर तक्रार करणार -सोमैया