मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. कमी चाचण्यांमुळेच सातत्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणसुद्धा अधिक आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
देशात महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची व मृत्युंची संख्या सर्वाधिक आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सातत्याने कोरोनावरील उपाययोजनांवरून राज्य सरकारवर टीका करत आहे. त्यांनी आज ट्विट करून कोरोना चाचण्या, पॉझिटिव्ह रुग्ण, रोज वाढणारे संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण यांची मुंबई आणि महाराष्ट्राची आकडेवारी ट्विटमधून दिली आहे. दिल्लीत केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर आणि तेथे मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहे. त्यामुळे तेथी रुग्णसंख्या, मृत्यूचे प्रमाण आणि संसर्गाचे प्रमाण होत असल्याचे विरोधी पक्षनेते फडवणीस यांनी म्हटले आहे.
कोरोना चाचण्या सातत्याने कमी करण्यामुळे आपण काय कमाविले आणि काय गमाविले? असा प्रश्न विचारत त्यांनी राज्यातील कोरोनाबाबतची आकडेवारी ट्विटमधून दिली आहे. महाराष्ट्रातील संसर्गाचे प्रमाण सुरुवातीला 6 ते 7 टक्के होते. हे संसर्गचा प्रमाण 8 जूनपर्यंत 17-18 टक्क्यांवर आले. त्यानंतर सध्या संसर्गाचे प्रमाण हे 23 ते 24 टक्के झाले आहे. याचा अर्थ 100 चाचण्यांमधून 24 जणांना कोरोनाचे निदान होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुंबईचा संसर्गाचे प्रमाण सातत्याने 21 ते 27 टक्क्यांवर स्थिरावलेला आहे.
1 ते 19 जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी केवळ 5 हजार 500 चाचण्या दररोज होत आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाबळींची संख्या दररोज सरासरी तेवढीच आहे. नवी दिल्लीतील स्थितीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतर संसर्गाचे प्रमाण 30 ते 35 टक्क्यांहून आता 6 टक्क्यांवर आलेला आहे. कोरोना बळींच्या संख्येतही घट झाली आहे. असे असले तरी कोरोना चाचण्यांची संख्या तरीही दररोज कायम ठेवण्यात आल्याचे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याशिवाय पर्याय नाही..
मोठ्या प्रमाणात चाचण्यांना दुसरा कोणताही पर्याय नाही. कोरोनावर मात करण्याचा, रुग्णसंख्या कमी करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय म्हणजे अधिकाधिक चाचण्या करणे आहे. आता, तर जागे व्हा, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. संशयितांचे विलगीकरण आणि इतरांची सुरक्षेची काळजी केली पाहिजे, अशी फडणवीस यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.