मुंबई - मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत मुंबईमध्ये कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला यश आले आहे. नागरिकांचीही चांगली साथ मिळत असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्ण दुपटीचा कालावधी एप्रिलमध्ये ४५ दिवसांवर आला होता. मात्र गेल्या काही महिन्यात कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने हा कालावधी ९ नोव्हेंबर रोजी २२४४ दिवसांवर गेला आहे. तर २५ नोव्हेंबर रोजी हा कालावधी २६१६ दिवसांवर पोहचला आहे. मुंबईमधील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात असाल तरी आम्ही परिस्थितीवर आणि रुग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहोत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी २६१६ दिवसांवर -
मुंबईत फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. १ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ५६४ दिवस इतका होता. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला १० ते ११ हजार रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या वाढू लागल्याने १ एप्रिलला रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ तर १८ एप्रिलला हा कालावधी ४५ दिवसांवर घसरून खाली आला होता. १ मे रोजी ९६ दिवस, १ जून रोजी पासून ४५३ दिवस, १ जुलै रोजी ७३३ दिवस, १ ऑगस्ट रोजी १४५८ दिवस, १ सप्टेंबर रोजी १४७९ दिवस, १ ऑक्टोबर रोजी हा ११५९ तर १ नोव्हेंबर रोजी हा कालावधी १५९५ दिवस इतका नोंदवला गेला. ऑगस्टमध्ये दिवसाला हा कालावधी २०५८ दिवसांवर पोहचला होता. त्यानंतर हा कालावधी घसरला होता. ९ नोव्हेंबर रोजी हा कालावधी २२४४ दिवस इतका नोंद झाला. तर २५ नोव्हेंबर रोजी हा कालावधी २६१६ दिवसांवर पोहचला आहे.
७ लाख ६१ हजार नागरिकांना कोरोना -
मुंबईमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्या वर्षी मार्च महिन्यात आढळून आला. त्यानंतर आतापर्यंत गेल्या पावणे दोन वर्षात ७ लाख ६१ हजार ९५५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७ लक्ष ४० हजार ७०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १६ हजार ३१९ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर २३६४ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण संख्या कमी झाल्याने एकही झोपडपट्टी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली नाही. तर ज्या इमारतीमध्ये ५ रुग्ण आढळून येत आहेत अशा १६ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
पालिका अलर्टवर -
मुंबईत सध्या कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात असल्याने रोज सुमारे २०० रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत गणेशोत्सव व इतर सण साजरे झाले असले तरी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आलेले नाही. पावसाळ्यानंतर राज्याबाहेर गेलेले कामगार पुन्हा मुंबईत यायला सुरुवात झाली आहे. पुढील महिन्यात ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट सारखे सण साजरे केले जाणार आहेत. यासाठी परदेशातून पर्यटक मुंबईमधून येतात. परदेशात कोरोनाच्या लाटा मागून लाटा आल्या आहेत. त्यामुळे पालिका अलर्टवर आहे. रेल्वे स्थानकांवर राज्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनींग केली जात आहे. परदेशातून विमानतळावर जे पर्यटक येणार आहेत त्यांची स्क्रिनींग केली जात आहे. लसीचे दोन डोस घेतले नाहीत अशा पर्यटकांच्या आरटीपीसीआर टेस्ट केल्या जात आहेत. ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही त्यांना ७ दिवस क्वारंटाईन केले जात आहे. डिसेंबर दरम्यान रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांना लागणारी औषधे, ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. कोरोनासह इतर आजारांवरही पालिकेने लक्ष ठेवले आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
काय असतो रुग्ण दुपटीचा कालावधी -
रुग्णसंख्या कमी झाल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढतो. रुग्णसंख्या वाढल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होतो. दुसऱ्या लाटेदरम्यान फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढू लागल्यावर एप्रिल महिन्यात दिवसाला १० ते ११ हजार रुग्ण आढळून आले. त्यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन ४५ दिवसांवर आला होता. ऑगस्टमध्ये दिवसाला २०० ते ३०० रुग्ण आढळून येत असल्याने हा कालावधी २०५८ दिवसांवर पोहचला होता. ९ नोव्हेंबरला हा कालावधी मात्र आता हा कालावधी कमी होत आहे. याचा अर्थ कोरोनाचा प्रसार पुन्हा सुरु झाला आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - MLC Election 2021 : विधानपरिषदेच्या चार जागा बिनविरोध, तर दोन जागांवर होणार लढत